महाराष्ट्र : पनीर भेसळ: पनीर हा फक्त व्हेजच नाही तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचा देखील आवडता पदार्थ. कार्यक्रम कोणताही असो पनीरचा बेत फिक्स असतोच. पनीर खाणाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा आहे. 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. पनीर खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येवू शकते.
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशभरात घेतलेल्या 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीर हे सर्वात जास्त भेसळयुक्त उत्पादन असल्याचे समोर आले आहे. या तपासणीत पनीरमध्ये स्टार्च, डिटर्जंट, युरिया आणि इतर हानिकारक पदार्थांचा समावेश असल्याचे आढळले, ज्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
FSSAI ने देशभरातील बाजार, दुकाने आणि डेअरींमधून अन्न नमुने गोळा केले. यामध्ये पनीरच्या नमुन्यांमध्ये भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आढळले. काही नमुन्यांमध्ये पनीर बनावट असल्याचेही उघड झाले, ज्यामध्ये दूधाऐवजी रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय, काही पनीर नमुन्यांमध्ये पाणी आणि स्टार्चचे प्रमाण जास्त आढळले, ज्यामुळे त्याची पौष्टिकता कमी झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने पचनसंस्थेचे विकार, अॅलर्जी, आणि दीर्घकालीन आजार होऊ शकतात. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांसाठी हे अधिक धोकादायक आहे. FSSAI ने ग्राहकांना सतर्क राहण्याचा आणि पनीर खरेदी करताना त्याची शुद्धता तपासण्याचा सल्ला दिला आहे. FSSAI ने भेसळ करणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ग्राहकांना ब्रँडेड आणि प्रमाणित पनीर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे जिल्ह्याच्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या फँक्टरीवर पुणे पोलिसांच्या युनिट सहा गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली होती. यावेळी 11 लाख 56 हजार रुपये किंमतीचे भेसळयुक्त पनीर आणि विविध मुद्देमाल हस्तगत करण्यात आले होते. प्रशासनाकडून नागरिकांनी पनीर खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सौ.झी.न्यूज































