पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, तर बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले.
?
भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी युद्धविरामाची घोषणा झाली होती. युद्धबंदीच्या घोषणेच्या तीन तासांतच पाकिस्ताने आपला रंग दाखवत भारताच्या सीमावर्ती भागात 11 ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीच सैन्याने पाकच्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर देत त्याचा डाव हाणून पाडला. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी उपरोक्त विधान केले.
नेमके काय म्हणाले रोहित पवार?
युद्धबंदी होऊन तीन तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर 1971 मध्ये ज्याप्रमाणे स्व. इंदिरा गांधीनी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे. सेना सज्ज आहे, सेनेवर देशाचा विश्वास आहे, सरकारने निर्णय घ्यावा, संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
सीमावर्ती भागात पुन्हा ब्लॅकआउट
रात्री 8 वाजल्यापासून जम्मू-काश्मीरमधील अखनूर, पूंछ, नौशेरा, श्रीनगर, आरएस पुरा, सांबा, उधमपूर येथे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. राजौरीमध्ये तोफांचा मारा करण्यात आला. उधमपूरमध्ये ड्रोन हल्ला झाला. युद्धबंदीच्या घोषणेनंतर, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट रद्द करण्यात आला. पण, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
भारतीय सैन्याला कडक पावले उचलण्याचे आदेश
दुसरीकडे, पाकिस्तानचे अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकने सामंजस्य कराराचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सचिव विक्रम मिस्त्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा…
भारत नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक:त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर त्या स्वागतार्ह, युद्धविरामानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषनेनंतर सीमावर्ती भागाता नागरिकांमध्ये आनंदाने वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान मधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक आहे. त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर त्या स्वागतार्ह असल्याचे शरद पवार म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

































