ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पण हे ब्रँड संपणार नाही, हे मी लिहून देतो, असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी खळबळजनक दावा केला.
?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोखठोक शैलीत आपले मत व्यक्त करत असतात. आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि परखड भूमिका घेण्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत भाष्य केले होते. आता त्यांनी ‘मुंबई तक’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे आणि पवार ब्रँड याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत उपरोक्त दावा केला आहे.
नेमके काय म्हणाले राज ठाकरे?
दिल्लीमध्ये जेव्हा-केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो. तेव्हा दोन आडनावे प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे, तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, यात काही वादच नाही. पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला, तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे, उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत राज ठाकरेंचा दावा काय?
काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल, असे मला गेले दीड, दोन वर्ष जाणवत होते, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हिंट दिली किंवा राज ठाकरेने सगळे सांगितले असे व्हायला नको होते म्हणून मी ही गोष्ट जाहीररीत्या कधी कुठे बोललो नव्हतो. पण तुम्हाला मी आता जे सांगतोय ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय.. गेले वर्षभर.. आमचे अनिल शिदोरे असतील किंवा.. इतर लोकं असतील. मी त्यांच्या भेटी घालून देईल तुम्हाला, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. जे 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती होती. आपले लोकं तिकडे जात होते, खेळत होते.. सगळ्या गोष्ट होत होत्या.
मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होते काश्मीरबद्दलचे.. काय आहे की, शांतता आणि सन्नाटा यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. शांतता ही चांगली असते, सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरबद्दल मला जे जाणवत होतं तो सन्नाटा होता. त्यातून बाहेर काय-काय गोष्टी पडतील ते मला माहीत नाही. पण ज्या दिवशी ही घटना घडली. मी तुम्हाला आतापण मोबाइल फोन दाखवायला तयार आहे. अनिल शिदोरेंचा मेसेज आहे की, ‘तुम्ही बोललात तसे झाले’ त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे, असे राज ठाकरे म्हणाले.
मी कोणी भविष्यवेत्ता नाही किंवा ज्योतिषी नाही. माझे काही ठोकताळे आहेत, माझे काही अंदाज आहेत. मला आतून काही वाटते की, या गोष्टी घडतील. मी त्या प्रकारे सांगतोय हे.. मी काही निवडणुकीसाठी बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
































