‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे उत्साहात उद्घाटन; २४ स्टार्टअप्सना बक्षिसे, गुंतवणूकदारांशी थेट संवादाची संधी
पुणे (दि.10) : “आजच्या आधुनिक युगात विविध क्षेत्रांतील आव्हानांवर मात करण्यासाठी नवकल्पनाच हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र या नवकल्पनांना पोषक वातावरण व व्यासपीठांची सतत गरज आहे. त्यामुळेच अशा व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, जेणेकरून समाजाच्या तळागाळातील कल्पना देखील पुढे येतील,” असे प्रतिपादन राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले.
उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलनाने या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ॲड. शेलार यांच्या हस्ते सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले.
डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी चंद्रकांत पाटील, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, अमृता व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला समान संधी व संरक्षणाची हमी देते. त्याला अनुसरून शहरी व ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. अशा स्टार्टअप प्रदर्शनांमुळे नवकल्पनांची वास्तवातील चाचणी होते आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठा टप्पा गाठला जातो,” असेही शेलार यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात स्टार्टअप्सच्या संकल्पना कशा समोर आल्या, याचा मागोवा घेतला. “वर्क फ्रॉम होम संस्कृतीत डेस्टिनेशन को वर्किंगने महत्वाची भूमिका बजावली असून, त्यात कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या चर्चांतून स्टार्टअप एक्स्पोची कल्पना उदयास आली,” असेही त्यांनी नमूद केले.“२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना उद्योजक बनवून देश संपन्न करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी नवे शैक्षणिक धोरण, प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती व मातृभाषेतील शिक्षण यास प्राधान्य दिले गेले. त्यामुळे आज भारतातील महिला स्टार्टअप्स जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली.
एमआयटीचे डॉ. राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच नवकल्पनांसाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. “स्टार्टअप एक्स्पोला पाठिंबा देणे, हे एमआयटीच्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे,” असे ते म्हणाले.
एक्स्पोच्या संयोजिका अमृता देवगांवकर यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे नवोदित उद्योजक व विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले असून, यामार्फत स्टार्टअप्सना बाजारपेठेत ओळख निर्माण करण्याची आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळेल.” मंदार देवगांवकर व अमित आंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी केले.

































