वसमत तालुक्यातील हट्टा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवारी ता. ८ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर घेण्यात आले. यावेळी १८९ लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे समाधान करण्यात आले. यावेळी तहसीलदार शारदा दळवी यांनी मार्गदर्
?
हट्टा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकरी तसेच नागरीकांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर झाले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबीरात तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथकही हजर होते.
यावेळी तहसीलदार दळवी यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी, गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत तसेच त्यांच्या अडचणींची गाव पातळीवरच सोडवणुक व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हे शिबीर घेतले जात असल्याचे सांगितले. या शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी अडचणी मांडाव्यात व त्यांची सोडवणुक करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिबीरामध्ये जिवंत सातबारा अंतर्गत २१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या शिवाय फेरफाराची १७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. याप्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन सदर प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची ८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ९ प्रकरणांत शिधापात्रिकेत नांवे समाविष्ट करण्यात आली आहेत. ८ लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या असून सात जणांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच दोन जणांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झाली असून ११ जणांना आयुष्मान कार्ड देेण्यात आले. तर ३१ जणांचे आधारकार्ड अपडेट करून देण्यात आले आहे. या शिबीरामुळे गावपातळीवरच सर्व प्रकरणांची सोडवणुक झाल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
































