‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांचे स्तर निश्चित करून, “विद्यार्थी विशिष्ट कृती आराखडा” तयार करणे आवश्यक आहे’असे मत आलेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख निवास चव्हाण यांनी येथे केले. १९ एप्रिलला आलेगाव येथील जिल्हा परिषद व प्राथमिक उर्दू शाळेत झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते.
प्राथमिक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांचा सध्याचा अध्ययन स्तर निश्चित करून आराखडा तयार करताना मुलांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या क्षेत्रातील प्रगतीसाठी वैयक्तिक तंत्रांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व गणितीय कौशल्य यामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या विविध उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. यावेळी चव्हाण यांनी शिक्षणाच्या गुणवत्तात्मक विकासासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांचा संयुक्त सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विषयसाधन व्यक्ती नितीन गुल्हाने यांनी ५ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे उलगडून सांगितले. त्यांनी निपुण भारत अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती दिली आणि ३० जून पर्यंत ७५ टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित स्तर प्राप्त करावा, यासाठी ठोस उपाय सांगितले. विशेषतः “चावडी वाचन व गणन’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, सुधारित अभ्यासपद्धती, सुटीतील सराव उपक्रम, डिजिटल साधनसामग्री, ‘व्हीएसके’ प्रणालीवरील नोंदणी, आणि समाज सहभाग यासारख्या बाबींचाही परिषदेतील चर्चेत समावेश झाला.
या परिषदेस आलेगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक हरीश इंगळे, दत्तात्रय राऊत, संतोष खडसे, रमेश खर्डे, वसंत राठोड, शुभांगी वाघमारे, लक्ष्मी तायडे, अर्चना चव्हाण, चंदा राठोड, स्वाती राखोंडे, गणेश डाखोरे, आमिर खान आणि हरिदास लठाल यांचा उपस्थितीत सक्रिय सहभाग लाभला. कार्यक्रमासाठी आलेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. अली अ. अजीज व त्यांच्या टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.
शासन निर्णयानुसार, प्रत्येक शाळेत १५ दिवसांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या उच्च स्तरावर प्रगती झालेल्या विद्यार्थ्यांची चावडी वाचन व गणन सत्र आयोजित करावीत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान विस्तारण्याची संधी मिळते. या सत्रात विद्यार्थ्यांना वाचन, गणन, शैक्षणिक क्रियाकलापांत प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन दिले जाते. यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढते, विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरणा मिळते. या सत्रांनी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासातही वृद्धी होते.






























