ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये युद्ध भडकले तर पाक त्यात 4 दिवसही टिकणार नसल्याचा दावा भारताचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी गुरुवारी केला आहे. भारताने गुरुवारी सकाळी पाकचे प्रमुख बंदर शहर असणाऱ्या लाहोर येथील एअर डिफेन्स रडार यंत्
?
सूर्यकांत चाफेकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, पाकच्या एका कृतीवर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. आत्ता अवघा लाहोर उघडा पडला आहे. भारताच्या प्रतिक्रियेनंतर पाकने आणखी एखादी कुरापत केली तर पाकिस्तान 4 दिवसही युद्ध लढू शकणार नाही. तो नष्ट होईल.
हवाई क्षेत्रात भारताची पाकवर मात
ते पुढे म्हणाले, हवेतून कोणताही हल्ला झाला तर तो एअर डिफेन्स सिस्टीम या एकमेव मार्गाद्वारे रोखता येतो. एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक सेन्सर, वेगवेगळ्या आकाराचे रडार्स तथा शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्र रोखणारी क्षेपणास्त्र प्रणाली असते. सीमेपासून खूप आत या यंत्रणेची नियंत्रण प्रणाली असते. तिथे त्या भागाचे संपूर्ण हवाई चित्र दिसते. हवाई सुरक्षा प्रणाली उत्तम असेल तर कोणताही हवाई हल्ला हाणून पाडता येतो. लाहोरची हवाई सुरक्षा प्रणाली निकामी झाल्यामुळे भारताने या क्षेत्रात पाकला मात दिली आहे. भारत या बाबतीत पाकवर वरचढ ठरला आहे.
भारताने पाकची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करणे हे एक मोठे यश आहे. पाक वापरत असलेली चिनी बनावटीची एचक्यू-9 हवाई सुरक्षा यंत्रणा सक्षम होती. पण ती आता खूप जुनी झाली आहे. त्या तुलनेत भारताची एस-400 हवाई सुरक्षा प्रणाली प्रगत आहे. भारताच्या एस-400 प्रणालीच्या तुलनेत चिनी बनावटीच्या एचक्यू-9 हवाई सुरक्षा प्रणालीचे रडार चांगले नाहीत. त्यांची कम्युनिकेशन यंत्रणा चांगली नाही. त्याचे अपग्रेडेशन झाले नाही. त्यामुळे पाक संकटात सापडला आहे, असे सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितले.
पाकिस्तान कुठे चुकला?
उल्लेखनीय बाब म्हणजे हवाई सुरक्षा यंत्रणा कितीही चांगली असली तरी ती हाताळणारी मानवी बुद्धी अत्यंत महत्त्वाची ठरते. रडारवर एखादे मोठे विमानही काही मिलिमीटर आकाराचे दिसते. भारताचे ड्रोन तर एखाद्या टिम्बासारखे दिसले असेल. त्यातही पाकची चूक झाली. यावरून हवाई सुरक्षा प्रणाली हाताळणारी मानवी बुद्धी किती महत्त्वाची ठरते हे स्पष्ट होते. पाक परिस्थितीत आणखी चिघळवण्याचा प्रयत्न करेल, पण भारत त्याला असे करू देणार नाही, असा विश्वासही सूर्यकांत चाफेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
पाकने बुधवारी रात्री भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने प्रत्युत्तरादाखल पाकवर ड्रोन हल्ले केले. त्यात पाकचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घाबरून पाकने इराणकडे मदतीसाठी धाव घेतली आहे, असेही एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यावेळी बोलताना म्हणाले.
































