भारत निवडणूक आयोग: महाराष्ट्रातील वातावरण मतदारयाद्यांमधील घोळावरुन तापलेलं असतानाच दुसरीकडे एका दाक्षिणात्य राज्यामध्ये चक्क अभिनेत्रींच्या नावाने खोटी मतदार ओळखपत्रं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया, समंथा रूथ प्रभू आणि रकुलप्रीत सिंग यांचे फोटो असलेले बनावट मतदार ओळखपत्र सापडले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत.
नेमका कुठे घडला हा प्रकार?
हा सारा प्रकार तेलंगणातील जुबली हिल्स येथे घडला आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीच्या आधीच येथे तमन्ना, समंथा आणि रकुलप्रीतचे फोटो असलेले बनावट मतदार ओळखपत्रं सापडल्याने खळबळ उडालीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रकाशझोतात आल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विशेष म्हणजेच या तिन्ही अभिनेत्रींच्या नावावर असलेल्या मतदान ओळखपत्रावर एकच पत्ता आहे. ही सगळी ओळखपत्र एकाच कागदावर छापण्यात आली असून एकामागोमाग एक या तिघींची नावं असल्याची माहिती मिळत आहे. या एका कागदाने तेलंगणच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
कधी आणि का आहे पोटनिवडणूक?
जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या वर्षी जून महिन्यात येथील स्थानिक ‘भारत राष्ट्र समितीचे आमदार मागंती गोपीनाथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली जात आहे. या मतदारसंघातून तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेसने व्ही नवीन यादव यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते, तर विरोधी पक्ष बीआरएसने दिवंगत आमदाराच्या विधवा मागंती सुनीता यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे लंकाला दीपक रेड्डी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेसवरच व्होट चोरीचा आरोप
यापूर्वी, भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी काँग्रेसवरच जुबली हिल्स मतदारसंघात व्होट चोरी केल्याचा आरोप केलाय. या मतदारसंघात काँग्रेसने ‘हजारो बनावट मतदार’ नोंदवल्याचा आरोप के. टी. रामा राव यांनी केला आहे. “लोक काँग्रेसवर खूप नाराज आहेत, म्हणून त्यांना माहिती आहे की त्यांना मते मिळणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक घराच्या पत्त्यावर अनेक खोट्या मतदारांची नोंद केली आहे. प्रत्येक घरात 43 बनावट मतं नोंदवण्यात आली आहेत. एकूण, हजारो बनावट मते नोंदवली गेली आहेत. आम्ही त्यासंदर्भातील शोध घेत असून आवश्यक त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करू,” केटीआर म्हणाले. दरम्यान, बीआरएसने तेलंगणा उच्च न्यायालयात आणि ज्युबिली हिल्समध्ये बनावट मतदारांच्या आरोपावरून याचिकाही दाखल केली.

न्यायालयात काय घडलं?
बीआरएस जुबली हिल्सच्या उमेदवार मागंती सुनीता यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने, यासंदर्भात कोणत्याही निर्देशांची आवश्यकता नाही. राज्य निवडणूक आयोग आधीच मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेत असल्याने पुढील कोणतेही आदेश जारी करू शकत नाही, असं मत मांडत याचिकेवरील सविस्तर सुनावणी फेटाळली.
राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, बीआरएस नेत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच प्रकरणाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “बीआरएस तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही हा आरोप खोटा आहे,” असं निवडणूक आयोगाचे वकील म्हणाले. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोग कारवाई करेल, अशा शब्द आयोगाच्या वकीलांनी न्यायालयाला दिला.
































