चीन ऑन अमेरिकन टॅरिफ ऑन इंडिया: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताआधी चीनवरही अशाच प्रकारे आयात शुल्क आकारलं होतं. यामुळे चीन ट्रम्प यांच्या भारतासंदर्भातील निर्णयावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान महत्ताची घडामोड समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत. गेल्या सात वर्षांत हा त्यांचा पहिलाच चीन दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झालेला असतानाच पंतप्रधान मोदींचा चीन दौरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताच्या हितांचं रक्षण केलं जाईल आणि यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला दिलेलं प्रत्युत्तर आणि यानंतर त्यांच्या चीन दौऱ्यासंदर्भात चीनमध्ये खूप चर्चा सुरु आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र, ग्लोबल टाइम्सने यावर संपादकीय लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, दोन्ही देशांमधील आक्रमकपणा हा एक संकेत आहे की अमेरिका भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही.
चिनी वृत्तपत्राने लिहिले आहे की, ‘चीन आणि भारत यांच्यातील दीर्घकाळापासून असलेले मतभेद आणि वाद असूनही, द्विपक्षीय संबंधांमध्ये आक्रमकतेची चिन्हं दिसत आहेत. २०२० च्या सीमा संघर्षानंतर, चीन-भारत संबंध दीर्घकाळ चढ-उतारांच्या काळातून गेले, ज्याचा राजकीय विश्वास, आर्थिक संबंध आणि लोकांमधील देवाणघेवाणीवर गंभीर परिणाम झाला.’
ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे की, ‘ऑक्टोबर 2024 मध्ये, कझानमध्ये पंतप्रधान मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यातील यशस्वी बैठकीने द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन सुरुवात करण्याचा पाया घातला. दोन्ही देशांचे नेते सर्व स्तरांवर सहमत आहेत की भारत आणि चीन एकमेकांसाठी धोका नाही तर विकासाची संधी आहे आणि ते प्रतिस्पर्धी नाहीत तर सहकारी भागीदार आहेत.’
ग्लोबल टाईम्सने व्यक्त केली शंका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं मोकळेपणाने स्वागत करताना ग्लोबल टाईम्सने काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताकडून अनेक अडथळे निर्माण करण्यात आले जे दूर केल्याशिवाय नात्यात विश्वास निर्माण करणं कठीण असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वृत्तपत्राने लिहिलं आहे की, ‘जर मोदी यावेळी चीनला भेट देत असतील तर ते चीन-भारत संबंध मजबूत करण्याची संधी प्रदान करेल. तथापि, दोन्ही देशांमधील अजूनही अनेक गंभीर मुद्दे आहेत जे सोडवणं आवश्यक आहे. चिनी गुंतवणुकीचा आढावा घेणे आणि दडपशाही करणे, चिनी तांत्रिक तज्ञांसाठी व्हिसावर बंदी घालणे आणि दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पूर्णपणे सुरू करण्यापासून रोखणे, भारताने अनेक अडथळे निर्माण केले आहेत जे द्विपक्षीय संबंधांमध्ये अडथळा बनले आहेत.’
वृत्तपत्राने लिहिले की, अडथळ्यांमुळे द्विपक्षीय संबंधांना प्रत्येक प्रकारे नुकसान झाले आहे आणि जर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या चीन दौऱ्यात हे मुद्दे सोडवले तर संबंध आणखी मजबूत होण्यास वाव मिळेल.
वृत्तपत्र लिहिते की, ‘चीन आणि भारत हे शेजारी आहेत आणि ते ज्या क्षेत्रात सहकार्य करू शकतात त्यांची यादी मोठी आहे. जर यावेळी मोदींचा चीन दौरा शक्य झाला तर ते चीन आणि भारत यांच्यातील सहकार्यासाठी एक मोठे व्यासपीठ बनेल. एससीओद्वारे सहकार्य मजबूत केल्याने दोन्ही देशांच्या विकासालाच फायदा होणार नाही तर प्रादेशिक शांतता आणि समृद्धीलाही हातभार लागेल. हिंदूंमध्ये म्हण आहे की, “तुमच्या भावाच्या बोटीला किनारी पोहोचवा आणि तुमची बोटही किनाऱ्यावर पोहोचेल.”
ग्लोबल टाईम्सने लेखाचा शेवट असा केला की, “द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या आणि ड्रॅगन (चीन) आणि हत्ती (भारत) यांच्यासोबत नृत्य करण्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्याच्या प्रामाणिक हेतूने पंतप्रधान मोदींच्या चीन भेटीचे आम्ही स्वागत करतो.”

































