भारत पाकिस्तान युद्ध: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भारतीय सैन्याने जाहीर पत्रकार परिषद घेतली. रात्री नेमकं काय घडलं? घटनाक्रमाचा संपूर्ण खुलासा भारतीय सैन्याने केला आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्रे डागली. येथील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. यानंतर पाकिस्तानने हे हल्ले केले. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज साउथ ब्लॉकमध्ये सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल नवीन माहिती दिली.
पाकिस्तानने 300 ते 400 ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. पाकिस्तानने भारतातील 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात तुर्कीमध्ये बनवलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने या हल्ल्याला ताबडतोब प्रत्युत्तर दिले आणि ड्रोनने प्रतिहल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानची देखरेख रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे आणि हा त्यांच्या लष्करी कारवाईसाठी मोठा धक्का असल्याचे सोफिया कुरेशी म्हणाल्या.
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. तंगधार, उरी आणि उधारपूर येथे धुव्वाधार गोळीबार झाला. पाकिस्तानी गोळीबारामुळे भारताचे नुकसान झाले आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांनी याचे फोटो दाखवले. भारतीय हवाई दलाने खूप संयम दाखवला आहे.
कंधार, उरी, पूंछ, राजौरी, अखनूर आणि उधमपूर यासारख्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात गोळीबार करून पाकिस्तानने भारताविरुद्ध चिथावणीखोर लष्करी कारवाई केली आहे. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलांना काही नुकसान आणि दुखापत झाली आहे, तथापि, प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.






























