असीम मुनीरला भारताला चेतावणी: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा देत गरळ ओकली आहे. भारताने केलेल्या कोणत्याही ‘लष्करी साहसाला’ ‘त्वरित, दृढ आणि कडक प्रत्युत्तर’ देण्यात येईल. सशस्त्र दलांनी आयोजित केलेल्या फील्ड ट्रेनिंग सरावासाठी मुनीर ‘फायरिंग रेंज’मध्ये उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि नवी दिल्लीकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा असून इस्लामाबादसहीत पाकिस्तानी सैन्यात भीतीचं वातावरण आहे. असं असतानाही पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे हे विधान समोर आले आहे. यापूर्वी मुनीर यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. ते पाकिस्तान सोडून पळून गेल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.
काय म्हणाले मुनीर
पाकिस्तानची सरकारी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) यासंदर्भातील वृत्त देताना, ‘भारताच्या कोणत्याही चुकीच्या लष्करी कृतीला जलद, ठाम आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल यात कोणतीही शंका नसावी,’ असे पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी सैनिकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटल्याचं नमूद केलं आहे. ‘पाकिस्तान प्रादेशिक शांततेसाठी वचनबद्ध असला तरी, आम्ही राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहोत,’ असे मुनीर यांनी टिल्ला फील्ड फायरिंग रेंज (TFFR) येथे सैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे. लष्कर मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजचा हवाला देत एपीपीने वृत्त दिले आहे की, जनरल मुनीर यांनी ‘हॅमर स्ट्राइक’ सराव पाहण्यासाठी टीएफएफआरला भेट दिली. युद्धाच्या परिस्थितीत लढाईसंदर्भातील तयारी, युद्धभूमीतील समन्वय आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणालींचे ऑपरेशन प्रमाणित करणे हे या सरावाचे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकेचं भारत-पाकिस्तानला आवाहन
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या निवेदनानुसार, ‘पाकिस्तानला प्रादेशिक शांतता हवी आहे, परंतु राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आमची तयारी आणि वचनबद्धता अटळ आहे,’ असं मुनीर यांनी भाषणात म्हटलं आहे. भारताच्या कारवाईच्या शक्यतेमुळे पुढील 36 तास महत्त्वाचे असतील, असे पाकिस्तानने बुधवारी म्हटले होते. तथापि, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी चर्चेतून तणाव मिटवावा असं आवाहन पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे भारतीय तपास यंत्रणांना पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे सबळ पुरावे मिळाले असून सध्या पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.






























