जॉब न्यूज: देशातील बेरोजगारीचा प्रश्न वारंवार चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. खासगी नोकरीबरोबरच सरकारी नोकरी मिळावी म्हणूनही अनेकजण सतत प्रयत्नात असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आणि मुलाखतींच्या माध्यमातून देशभरातील लाखो तरुण प्रचंड मेहनत घेतात. नोकरी कोणतीही असो पण सरकारी असली पाहिजे अशीही अनेकांची भूमिका असते. त्यामुळेच सरकारी नोकरीच्या जागा निघतात तेव्हा त्याचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. असाच काहीसा प्रकार सध्या राजस्थानमध्ये समोर आला आहे. राजस्थानमध्ये शिपाई पदासाठी 53 हजार 749 जणांची भरती होणार आहे. मात्र शिपाई होण्यासाठी तब्बल 24 लाख 76 हजार जणांनी अर्ज केला आहे. म्हणजेच एका पदासाठी 46 जणांमध्ये स्पर्धा असणार आहे.
वेबसाईट अनेक वेळा बंद
आश्चर्याची बाब म्हणजे अर्जदारांची शैक्षणिक पात्रता थक्क करणारी आहे. एमबीए, पीएचडीसारखं उच्च शिक्षण घेतलेल्यांनीही शिपाई होण्यासाठी अर्ज केला आहे. नागरी सेवांची परीक्षा देणाऱ्यांचाही अर्जदारांमध्ये समावेश आहे. यापैकी बरेचसे उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत आणि याबरोबरच ते प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या इतकी असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळेच अर्जदारांची संख्या इतकी जास्त होती की त्याने एकंदरित भरती प्रक्रियेवर ताण आला. अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, यामुळे वेबसाईट अनेक वेळा बंद पडल्याचं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दर सहा सेकंदाला एकाचा अर्ज
अर्ज भरण्यासाठी अखेरचे पाच तास शिल्लक असताना तब्बल 1 लाख 11 हजार अर्ज दाखल करण्यात आले. आकडेमोड केली तर शेवटच्या पाच तासांमध्ये प्रत्येक सहा सेकंदाला एक अर्ज दाखल करण्यात आला. अनेक इच्छूक उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्याने तसेच बऱ्याच जणांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता आल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यापूर्वीही अवघ्या 2 हजार 399 वनरक्षक पदांसाठी 22 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
राजस्थानमध्ये 30 ते 35 लाख बेरोजगार
अधिकृत आकडेवारीनुसार राजस्थान राज्यामध्ये 18 लाख तरुणांनी बेरोजगार म्हणून स्वत:ची नोंदणी केली आहे. नोंदणी न केलेल्यांचा विचार केला तर राजस्थानमधील एकूण बेरोजगारांची संख्या 30 ते 35 लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाचे सचिव भागचंद बधल यांनी दुजोरा दिला आहे. शिपाई पदांसाठी किमान पात्रता दहावीपर्यंतच्या शिक्षणाची असूनही उच्चशिक्षितांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.
3 लाख लोकांची परीक्षा घेण्याची क्षमता
सध्या प्रशासनापुढे या उमेदवारांची परीक्षा घेण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा पद्धतीचा आवाका पाहिल्यास एका वेळी जवळपास 3 लाख उमेदवारांची परीक्षा आयोजित करण्याची क्षमता या राज्याकडे आहे. त्यामुळे आता 24 लाख लोकांची प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ही प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये घ्यावी लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे.





























