अधिक मासानिमित्त उमराणे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महिला भगिनींनी तब्बल ११ हजार पुरणपोळ्या जमा करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला, तर ६ हजार लिटर सुग्रास केसर आंब्याच्या रसासह आयोजित महाप्रसादाचा त
.
चैतन्य महाराज देंगूळकर, पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कडक उन्हाची पर्वा न करता उमराणे व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या सोहळ्यासाठी अलोट गर्दी केली होती. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि भक्तीरसाने दुमदुमून गेला होता. महाप्रसादासाठी गावातील महिला भगिनींकडून सुमारे ७ ते ८ हजार पुरणपोळ्या जमा होतील, असा अंदाज उत्सव समितीला होता. मात्र, महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे उद्दिष्ट मोठ्या फरकाने ओलांडले गेले आणि तब्बल १० ते ११ हजार पुरणपोळ्या जमा झाल्या. टेंभी नाका मित्र मंडळ व श्री शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने भाविकांसाठी ६,००० लिटर सुग्रास केसर आंब्याचा रस तयार करण्यात आला होता. पुरणपोळी, आमरस, भात आणि आमटीच्या महाप्रसादाचा तब्बल ११ ते १२ हजार भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने लाभ घेतला.
काला म्हणजे केवळ दही-लाह्यांचा पदार्थ नव्हे, तर श्रद्धा, समर्पण, प्रयत्न आणि परमेश्वरभक्तीमधून मिळणारा दैवी प्रसाद आहे. मला मिळालेले ज्ञान जगाला देता आले पाहिजे, हाच खरा परमार्थ आहे, असे प्रतिपादन चैतन्य महाराज यांनी केले. या धार्मिक सोहळ्यास संगीतमय रामकथा प्रवक्ते अनंत महाराज वहाढणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विश्वनाथ महाराज कोल्हे (चिखलओहोळ) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत महाराज डोंगरगाव यांनी व्यासपीठाची धुरा सांभाळली.
सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण स्वयंसेवक तसेच श्री शिवजयंती उत्सव समिती व ‘टेंभी नाका मित्र मंडळ यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
































