भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसें दिवस कमी होत चालली असून भविष्यात पाण्याचे भिषण संकट ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने विविध उपक्रम राबवून पाण्याचा प्रत्येक थेंबाची बचत करणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
?
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पूर्णा, कयाधू व पैनगंगा या तीनही मुख्य नद्यांतील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे, कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, कार्यकारी अभियंता शेख, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, ‘उगम’चे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता पुढे म्हणाले, पाण्याच्या स्त्रोत वाढविण्यासाठी घरामध्ये शोषखड्डा, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रम राबवावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पुनरुर्जीवन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाची बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून पुनरुर्जीवन करण्याचे काम केले जाईल. पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्व महत्वाच्या मुद्यांवर केवळ पंधरवाड्यातच जनजागृती मोहिम न राबविता सर्वांनी पाण्याचे महत्व ओळखून सतत पाण्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरवण्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्याची गरज आहे. यासाठी जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले. सूत्रसंचालन कोकरे यांनी केले, तर आभार उप अभियंता कृषक कांबळे यांनी मानले.





























