नरेंद्र मोदी सेवानिवृत्ती: सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली याचा अर्थ थांबायला हवं असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्तीचा सल्ला दिल्याचा दावा केला जात आहे. मोहन भागवत यांच्या विधानानंतर आता नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा रंगलेली असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असं भाकीत ‘झी 24 तास’शी बोलताना वर्तवलं आहे.
मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “हीच तर समस्या आहे. बोलतातही आणि नंतर अंदाज लावण्यासाठी सोडून देतात. जर आहे तर स्पष्ट सांगितलं पाहिजे”.
पुढे त्यांना सांगितलं की, “सरकारी कार्यालयांमध्ये निवृत्तीसाठी 65 तर काही ठिकाणी 60 वयाची अट आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्यासाठी 75 वय असावं अशी अटक स्वत: त्यांनी तयार केली. या नियमाचा प्रभाव अनेक ज्येष्ठ नेत्यांवर पडला आणि त्यांना निवृत्त केलं गेलं. त्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं. नियम तयार करताना आपणही 75 वर्षांचे होऊ याची कल्पना होती. तरीही त्यांनी तो नियम बनवला. अर्थात त्यांची 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर ते आपला नियम तोडणार नाहीत. आम्हाला वाटतं की, सप्टेंबरमध्ये किंवा एक दोन महिने पुढे मागे नियमाचा आदर करत राजीनामा देतील”. नियमांचं पालन करुन त्यांनी आदर्श पाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=VBVA9ISF94K
मोहन भागवत काय म्हणाले?
75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं विधान मोरोपंत पिंगळे यांनी केल्याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली. साप्ताहिक विवेक निर्मित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे – द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक . मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
‘ठाकरे बंधू एकत्र राहणार नाहीत’
ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर शंकराचार्यांनी शंका व्यक्त केली आहे. दोघांचे स्वभाव; शैली भिन्न आहेत. एकत्र आले तरी सोबत राहतील असं वाटत नाही असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले आहेत. राज ठाकरे स्ट्रेट फॉरवर्ड, हिंदुत्ववादी हार्ड लाईन घेणारे आणि उद्धव ठाकरे सर्वसावेशकतेचं राजकारण करणारे त्यामुळे हे दोघे एकत्र राहतील की नाही याबाबत शंका आहे. मात्र दोघांनी राजकीय मुद्द्यांचा एक फॉर्म्युला नक्की करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दोन्ही ठाकरे आता एकत्र आले असतील तर एकत्रच राहीले पाहिजे; विभक्त झाले तर लोकांना वाईट वाटेल. महाराष्ट्राला यांच्या एकत्र येण्यानं आनंद झाला आहे असं त्यांनी सांगितलं
ठाकरे मूळचे मगधचे आहेत. महाराष्ट्रातील नाही, त्यांना मागधी भाषा येतेय का? त्यांनी मागधीत बोलुन दाखवावं असंही आव्हान त्यांनी दिलं. भाषीक अस्मितेवर चालणारं राजकारण फारसं यशस्वी होणीर नाही; फारसं चालणार नाही. हिंदी असो किंवा मराठी कोणतीही भाषा थोपता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
तामिळनाडूत हिंदीला सर्वाधिक विरोध झाला मात्र आता विरोध झाल्यामुळेच तामिळनाडूत सर्वांना हिंदी येते. जर राज ठाकरेंना वाटत असेल प्रत्येकाला मराठी यावं तर त्यात चूक नाही मात्र त्यासाठी मारहाण चुकीची असंही त्यांनी सांगितलं. मी दोन महिने मुंबईत आहे. मलाही मराठी शिकायचं आहे. मला ज्ञानेश्वरी मूळ भाषेत वाचायची आहे अशी इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली.































