चीन धरण प्रकल्प: भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरू असणारा सीमावाद थांबण्याचं नाव घेत नसतानाच चीन आणि अमेरिकेचा आयात शुल्कावरून सुरू असणारा वादही सर्वज्ञात आहे. अशातच चीन मात्र आपल्या खुरापती सुरूच ठेवताना दिसत असून आता तर या देशानं थेट निसर्गालाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगाला हादरवणारं काम सध्या चीन करत असून त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या चीन असं काय करतंय ज्यामुळं जगाला धोका?
उपलब्ध माहितीनुसार चीन जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत असून त्यासाठी एक मोधा बंधारा उभारत आहे. तिबेटच्या यारलुंग इथं असणाऱ्या त्सांगपो नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस डॅमहूनही हा बंधारा तिप्पट मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. हाच बंधारा भारतासाठी धोक्याची घंटा असून तो ‘वॉटर बॉम्ब’ही ठरु शकतो. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी यासंदर्भातील सावधगिरीचा इशारा देत लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री?
चीनच्या या बंधाऱ्याविषयी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, चीनची ही परियोजना आपल्या स्थानिकांसाठी आणि उपजीविकेसाठी अस्तित्वाचाच धोका निर्माण करु शकते आणि ही अतिशय घातक बाब आहे. चीनकडून या बंधाऱ्याचा वापर वॉटर बॉम्ब म्हणू केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तिबेटच्या यारलुंग नदीवर बांधण्यात येणारा हा बंधारा फक्त तिबेटपुरताच सिमीत नसून, भारताच्या अरुणाचल प्रदेशापर्यंत त्याचे परिणाम दिसून सियांग नदीत त्याचं रुपांतर होतं. पुढे दिबांग आणि लोहितसारख्या सहायक नद्यांच्यासाधीनं ब्रह्मपुत्रेत त्याचं रुपांतर होतं, ज्यावर भारत आणि बांगलादेशचे नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
चीनचा मेगाप्लान, भारतासाठी धोका….
चीनचा बंधारा पूर्ण झाल्यास त्यातून 60,000 मेगावॅट उर्जा उत्पन्न केली जाऊ शकते. याच बंधाऱ्याच्या माध्यमातून चीन पाणी थांबवू आणि सोडूही शकतं. चीननं पाणी रोखलं तर, अनेक नद्यांची पात्र कोरडीठाक पडतील, तर अचानक पाणी सोडलं तर भारतात पूराचा धोका उदभवू शकतो.
मुख्यत्वे या बंधाऱ्यांमुळं हिमालयाचा संवेदनशील भाग प्रभावित होणार असून, त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या भुयारामुळं धोका आणखी वाढेल. सोबतच भूकंप, भूस्खलनापासून बचावही अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे. चीनच्या या बंधाऱ्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या गतीवर होणार असून ती मंदावण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं चीन निसर्गालाच आव्हान देत आहे असं म्हणणं गैर नाही.
































