वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण निषेधार्ह असून हगवणे कुटुंबातील पाच जणांना यात आरोपी करण्यात आलेले आहे. तसेच एक आरोपी अद्याप आहे. वैष्णवी हिने आत्महत्या केलेली नसून तिची संगनमताने हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर मोक्का लागतो की नाह
?
वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे यांच्या कुटुंबाची भेट मनोज जरांगे यांनी सोमवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जरांगे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पोलिस यांनी कुटुंबाला घटनेच्या तपास प्रगतीबाबत माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, ती अद्याप दिली जात नसल्याचे दिसून आले आहे.
पोलिस यंत्रणेने बारकाईने तपास करून कुटुंबाचे म्हणणे पुन्हा ऐकून घेत त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला आणि आरोपींच्या बाजूने जर तपास झाला, तर राज्यातील गृह विभाग आणि गृहमंत्री अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट होईल. गृहमंत्रालय कमकुवत आहे आणि ते अन्याय झालेल्या ठिकाणी न्याय देत नाही असे दिसल्यास आम्ही राज्यात पुन्हा उठाव करून सरकारला जाब विचारू. पुन्हा लोक आंदोलनाच्या पावित्र्यात जातील. वैष्णवी हिला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सरकारने या प्रकरणात मोक्का लावतो सांगितले आहे. त्यामुळे त्याची प्रक्रिया तातडीने सुरू झाली पाहिजे. तसेच कुटुंबास अंधारात ठेवून तपास केला जाऊ नये. हुंड्यासारख्या कुप्रथा हुंडा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यानेही बंद केल्या पाहिजे. आपली संस्कृती वाईट दिशेने जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असेही जरांगे म्हणाले.
राज्य महिला आयोग यांच्याकडे ज्या तक्रारी येतात, त्याबाबत गांभीर्याने कारवाई झाली पाहिजे, त्यासाठीच आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी हक्काचे न्याय मंदिर म्हणून महिला आयोगाकडे पाहिले जाते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दखल घेतली जाणार नसेल तर महिला आयोग बरखास्त केलेला बरा अशी माझी भावना आहे. पुढील काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे आणि त्यांनी महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणालेत. दरम्यान, कस्पटे कुटुंबाची यांची स्व.सरपंच संतोष देशमुख कुटुंबाने भेट घेऊन सांत्वन करत चर्चा केली.
































