भारत पाकिस्तानचा तणाव प्रभाव : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या सीमाभागात असणाऱ्या तणावाचे दूरगामी परिणाम सद्धा स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. रेल्वे आणि हवाई वाहतूक या युद्धजन्य परिस्थितीमुळं प्रभावित झाली असून, कमीजास्त प्रमाणात नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण कायम आहे. शनिवारी पाकिस्तानशी भारतानं शस्त्रसंधी करत दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्याचं वृत्त समोर आलं असलं तरीही देशाच्या सीमावर्ती भाग किंवा त्यानजीकच्या भागांमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी मात्र हा तणाव पाहता आपला निर्णय बदलल्याचं स्पष्ट होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार पुण्यातून देशाच्या सीमावर्ती भागात जाणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या रद्द होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. पुण्याहून जम्मू, काश्मीर, राजस्थान, जयपूर, जोधपूरसारख्या सीमावर्ती भागांमध्ये जाणाऱ्या रेल्वेची तिकिटं प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहेत. सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रेल्वे प्रवासी वाहतुकीवर थेट परिणाम दिसून येतोय.
गेल्या काही दिवसांत या मार्गांवरील गाड्यांना जबरदस्त मागणी होती. सुट्ट्यांचा माहोल, उकाडा यामुळं उत्तरेकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढता होता. इतकंच काय तर रेल्वेची प्रतीक्षा यादी (Indian Railway Waiting List) 300-350 पर्यंत गेली होती. मात्र, हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्याही तिकीट रद्दीकरणात लक्षणीय वाढ झाली.
कोणत्या रेल्वेगाड्यांमध्ये झाले बदल?
पुणे-जम्मू तावी एक्सप्रेस (11077):
सेकंड एसी: 98 वरून 14
थर्ड एसी: 287 वरून 57
स्लीपर: 376 वरून 99
पुणे-जयपूर एक्सप्रेस (12939):
फर्स्ट एसी: 12 वरून 9
सेकंड एसी: 56 वरून 20
थर्ड एसी: 143 वरून 59
स्लीपर: 164 वरून 64
पुणे (हडपसर)-जोधपूर एक्सप्रेस (20496):
सेकंड एसी: 19 वरून 8
थर्ड एसी: 43 वरून 20
स्लीपर: 186 वरून 45
हेसुद्धा वाचा : ‘या’ राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नाही; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर Indian Railway चा मोठा निर्णय!
सहसा उन्हाळी पर्यटनासाठी प्रवाशांची प्रचंड झुंबड उडत होती, पण आता यद्धजन्य परिस्थितीनंतर हे चित्र बदललं असून प्रतीक्षा यादी 150 ते 200 ने घसरली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नाही, का घेण्यात आला हा निर्णय?
दरम्यान तणावाच्या या परिस्थितीत भारतीय रेल्वे सतर्क असून, शनिवारीच रेल्वे विभागानं काही निवडक रेल्वेमार्गांवर रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नसल्याचं स्पष्ट केलं. यामध्ये अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भारतीय रेल्वेने जम्मूतून निघणाऱ्या जवळपास सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.




























