खासगी बसला आग लागून 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे. मंगळवारी जैसलमेरहून राजस्थानमधील जोधपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. यानंतर बसमधील 19 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 प्रवाशांना घेऊन बस दुपारी 3 वाजता जैसलमेरहून निघाली. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर बसच्या मागच्या भागातून धूर येऊ लागला. यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. परंतु काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली.
स्थानिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्यात मोठी भूमिका पार पाडली. यादरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी प्रवाशांना जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
जैसलमेर जिल्हा प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत.
जैसलमेर, राजस्थानमधील दुर्घटनेमुळे जीव गमावल्यामुळे त्रास झाला. या कठीण काळात माझे विचार बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना.
रु. पीएमएनआरएफकडून 2 लाखांना दुसर्याला दिले जाईल…
– पीएमओ इंडिया (@पीएमओइंडिया) 14 ऑक्टोबर, 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि इतर नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जखमींना योग्य वैद्यकीय उपचार आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“जैसलमेरमध्ये बसला आग लागल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद अपघातात बाधित झालेल्यांप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर घटनेवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “राजस्थानातील जैसलमेर येथे अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दु:खी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.” पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
































