‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!
बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – रमेश शिंदे
पुण्यातील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी अखेर शासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात निवेदने देऊन ही संभाव्य बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली होती. याला संघटित प्रयत्नांमुळे मोठे यश आले असून प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.
हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील आघात असल्याचे निवेदनात म्हटले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या या तीव्र आंदोलनाची आणि मागण्यांची नोंद घेत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, ‘महात्मा फुले वाडा हे स्मारक राज्य संरक्षित घोषित होण्यागोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा व चालीरीती यांची सद्यःस्थिती कायम ठेवावी. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी.’
बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – श्री रमेश शिंदे
या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले की, फुले वाड्यासमोरील वटवृक्षाच्या येथे वटसावित्री व्रताचे चालू असलेले पारंपारिक पूजन बंद करण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व खात्याने काढला होता. त्याला हिंदु जनजागृती समितीकडून विरोध केल्याने आणि अधिवक्त्यांनी कायदेशीर नोटीस दिल्याने त्यांना लोकशाहीची जाणीव झाली आणि भारतात धर्मस्वातंत्र्य आहे, हे मान्य करून त्यांनी तो तुघलकी आदेश मागे घेतला आहे. फडणवीस सरकारचे याबद्दल अभिनंदन; मात्र या प्रकरणात सरकारने हिंदूंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच झारीतील शुक्राचार्य बनलेल्या पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सध्या महाराष्ट्रात असा तुघलकी कारभार चालणार नसल्याचे लक्षात आणून द्यावे, ही सरकारकडे मागणी आहे.
या यशानंतर समितीच्या वतीने समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी आवाहन केले आहे की, “जास्तीत जास्त हिंदू महिलांनी महात्मा फुले वाडा येथे जमून उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा जपून या विजयाचा आनंद साजरा करावा”.






























