वीज वितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीच्या पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरुध्द धडक मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत २९२ जणांवर कारवाई करून ६५.३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरी करणाऱ्या विरोधातील मोह
?
नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. वीज चोरीच्या घटनेमुळे वीज गळतीचे प्रमाणही वाढले असून त्यामुळे योग्य दाबाने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच वीज कंपनीचे छत्रपती संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांच्या पथकाने नांदेड परिमंडळाचा दौरा केला होता.
त्यानंतर औंढेकर यांनी नांदेड परिमंडळात वीज चोरी विरुध्द मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी तातडीने अधीक्षक अभियंत्यांना पथके स्थापन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन जिल्ह्यात एकूण १३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध मोहिम हाती घेत २९२ जणांवर कारवाई केली आहे. या सर्वांनी एकूण ४.९३ लाख युनिट वीज चोरी केल्याचे उघड झाले असून ६५.३६ लाखांच्या दंडाची वसूली करण्यात आली आहे.
यामध्ये नांदेड मंडळ अंतर्गत एकूण १०१ पथकामार्फत १४५ वीज चोरावर कार्यवाही करून ३ लाख ६६ हजार युनिट करिता रू ५०.२२ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे.
परभणी मंडळ अंतर्गत एकूण १२ पथकामार्फत ७६ वीज चोरावर कार्यवाही करून ७० हजार युनिट करिता रू ४.८७ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे. हिंगोली मंडळ अंतर्गत एकूण २३ पथकामार्फत ७१ वीज चोरावर कार्यवाही करून ५७ हजार युनिट करिता रू १०.२७ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे. महावितरण कडून दरमहा वीज चोरावर धडक कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.































