छत्रपती शिवाजी महाराज पुतळा: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. औरंगजेब नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आणि अस्मिता आहे, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातत्याने घेत असतात. त्यांनी 2023 साली लखनऊमध्ये चौक चौराहमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली. पण 2025 हे वर्ष संपत आलं तरीही या चौक चौराहमध्ये पुतळा उभारण्यात आलेला नाही. सरकारने अनुमती दिल्यानंतर तेथे पुतळा उभारण्याचे काम सुरु झाले. असे असूनही पालिकेने तेथे कवी अमृतलाल नागर यांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला आहे.
लखनऊच्या मध्यवर्ती चौकात अनावरण होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12.5 फूट पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येणार होती. मात्र लखनऊ महापालिकेच्या आडमुठ्या आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी अडचणीत आलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची सर्व सिद्धता पूर्ण झाल्यानंतर पालिकेने आता विरोध केल्याने मराठी भाषिक समाज संतप्त व्यक्त करण्यात येते आहे. आमचा अमृतलाल नागर यांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर पालिकेने जी भूमिका बदलली आहे, त्याला आहे. हा केवळ मराठी भाषिकांचा अवमान नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान आहे, अशी भावना मराठी समाज उत्तर प्रदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुमार पाटील यांनी व्यक्त केलीय.
उमेश कुमार पाटील यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी लखनऊ विद्यापिठाच्या शिवाजी क्रीडांगणात साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाची सुरुवात 19 फेब्रुवारी 2018 रोजी झाली आहे.
या ऐतिहासिक शोभायात्रेची सुरुवात चौक चौराह येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानशा प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून केली जाते. आता चौक चौराह येथे भव्य प्रतिमा उभारल्यामुळे, चौक चौराहापासून विद्यापीठापर्यंत होणाऱ्या शोभायात्रेच्या प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर दरवर्षी पूजा, सजावट आणि माल्यार्पण करता येईल. यामुळे समाजाला त्यांचे शौर्य, सामर्थ्य आणि पराक्रमाची प्रेरणा मिळेल आणि समाजात नवी ऊर्जा आणि जागरूकता निर्माण होईल.
FAQ
प्रश्न 1: ही घटना कशाबाबत आहे?
उत्तर: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने २०२३ मध्ये लखनऊच्या चौक चौराह येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास अनुमती दिली होती. पण लखनऊ महानगरपालिकेने (LMC) आता कवी अमृतलाल नागर यांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला आहे, ज्यामुळे मराठी समाज संतप्त झाला आहे.
प्रश्न 2: चौक चौराहा परिसर का महत्त्वाचा?
उत्तर: या परिसरात मराठी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. अनुमती मिळाल्यानंतर काम सुरू झाले, पण आता पालिकेच्या बदललेल्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला.
प्रश्न 3: मराठी समाजाचा विरोध कशाला?
उत्तर: मराठी समाज उत्तर प्रदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुमार पाटील यांनी सांगितले की, अमृतलाल नागर यांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण पूर्ण तयारीनंतर पालिकेच्या भूमिका बदलण्याला आहे. हा मराठी भाषिकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे.































