नवीन विवाह कायद्याची मागणीः भारतीय लग्न सोहळे हे जगभरात प्रसिद्ध आहेत. मोठ्या संख्येनं नातेवाईकांची उपस्थिती, भेटीगाठी आणि अनेक दिवस सुरु असणारं सेलिब्रेशन ही या प्रसिद्धीमागील मुख्य कारणं आहेत. खरं तर भारतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील नाते मानले जात नाही तर कुटुंबांचे मनोमिलन मानले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलगी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जातात आणि त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात. जरी आपला जोडीदार निवडणे हा स्वातंत्र्याचा एक भाग असला तरी, अनेकदा या असल्या निर्णयांमुळे वाद आणि तणाव निर्माण होतात. म्हणूनच आता पळून जाऊन लग्न करण्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली जात आहे.
कुठे आणि कोणी केली ही मागणी?
पळून जाणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी हरियाणा विधानसभेत करण्यात आली आहे. विधानसभेत विवाह कायद्याचा मुद्दा उपस्थित झाला. पळून जाऊन लग्न करण्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या एका आमदाराने नवीन विवाह कायद्याची मागणी केली आहे. खरं तर, हरियाणा भाजपचे आमदार राम कुमार गौतम यांनी मंगळवारी शून्य प्रहरात सांगितले की लग्नापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य करावी. सफिदोन मतदारसंघातील आमदार गौतम यांनी असा युक्तिवाद केला की सध्याच्या परिस्थिती पाहता असा कायदा आवश्यक आहे. ते म्हणाले की अनेक मुले आणि मुली पळून जातात आणि अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की पालकांना आत्महत्या करावी लागते. म्हणून सरकारने अशी तरतूद करावी की पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ शकत नाही.
जमिनीच्या भावातील तफावत कमी करण्याची मागणी
आमदारांच्या या मागणीवर उपस्थित इतर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पळून लग्न करण्याच्या मुद्द्याबरोबरच आमदार राम कुमार गौतम यांनी विधानसभेत बोलताना जमीन कलेक्टर रेटचा मुद्दाही उपस्थित केला. अनेक ठिकाणी सरकारी दर आणि जमिनीच्या बाजारभावात मोठी तफावत आहे. हा फरक दूर केला पाहिजे. कारण यामुळे भ्रष्टाचारही थांबेल, अशी मागणी राम कुमार गौतम यांनी केली.
विधानसभेबाहेरही या मागणीवर चर्चा
जेव्हा राम कुमार गौतम यांची बोलण्याची वेळ संपली तेव्हा सभापती हरविंदर कल्याण यांनी त्यांना थांबवले. गौतम यांना त्यांचे भाषण पुढे चालू ठेवायचे होते परंतु सभापतींनी हस्तक्षेप केला आणि सांगितले की जर त्यांना दुसऱ्या विषयावर काही बोलायचे असेल तर त्यांनी सूचना द्यावी. ज्याच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्याने सध्या विधानसभेच्या बाहेरही आमदारांमध्ये विवाह कायद्याच्या मागणीवर चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.
FAQ
पळून जाऊन लग्न करण्याविरोधात कायदा करण्याची मागणी कोणी केली?
हरियाणा भाजपचे आमदार राम कुमार गौतम यांनी विधानसभेत ही मागणी केली. त्यांनी शून्य प्रहरात सांगितले की, लग्नापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य करणारा कायदा बनवावा.
ही मागणी कुठे आणि कधी उपस्थित झाली?
ही मागणी हरियाणा विधानसभेत मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) शून्य प्रहरात उपस्थित झाली.
राम कुमार गौतम यांनी कायदा करण्यामागचे कारण काय सांगितले?
राम कुमार गौतम यांनी सांगितले की, अनेक मुले आणि मुली पालकांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न करतात, ज्यामुळे काही वेळा पालकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. यामुळे पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ नये, अशी तरतूद असावी.
या मागणीला विधानसभेत काय प्रतिसाद मिळाला?
या मागणीवर इतर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सभापती हरविंदर कल्याण यांनी गौतम यांना त्यांचे भाषण थांबवण्यास सांगितले आणि दुसऱ्या विषयावर बोलायचे असेल तर सूचना देण्यास सांगितले, ज्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.
































