भारतीय रेल्वे ट्रेनचे तिकीट: प्रवाशांचा रेल्वेप्रवास अधिक सुकर करण्याच्या हेतूनं भारतीय रेल्वेकडून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अगदी तिकीट आरक्षण असो किंवा रेल्वेमार्ग आणि प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सुविधा असो. रेल्वे विभाग कायमच प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेताना दिसला.
गेल्या काही दिवसांचाच आढावा घ्यायचा झाला, तर रेल्वेकडून तिकीट आरक्षणापासून, वेटिंग लिस्त, रिझर्व्हेशन चार्च आणि तत्काळ तिकीट बुकिंगसंदर्भातही काही निर्णय घेण्यात आले. ज्यानंतर आता रेल्वेनं एक विशेष टूर पॅकेज सादर केला असून, त्याअंतर्गत EMI म्हणजेच ठराविक रकमेच्या हफ्त्यांच्या स्वरुपातही रेल्वेचं तिकीट काढता येऊ शकतं.
फक्त रेल्वे तिकीटच नव्हे तर, भारतीय रेल्वेच्या अख्तयारित कार्यरत असणाऱ्या IRCTC च्या माध्यमातून विविध टूर पॅकेजही प्रवाशांना निव़डता येतात. यामध्ये विविध पर्यटनस्थळांपासून तीर्थक्षेत्रांचाही समावेश आहे. भारतीय रेल्वेनं अशाच एका प्रवासाला नाव दिलं आहे भारत गौरव यात्रा. ही एक अशी ट्रेन सुविधा आहे ज्या प्रवासात ईएमआयच्या आधारे ट्रेन पॅकेज बुक करता येतं.
कसा घ्यावा या सवलतीचा फायदा?
भारतीय रेल्वेच्या सर्वच रेल्वेंसाठी हा नियम लागू नाहीय आयआरसीटीसीकडून फक्त भारत गौरव ट्रेनपुरताच ही ऑफर सीमित आहे. तिकीट आरक्षण करतेवेळी इथं EMI हा पर्याय निवडता येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला 13 ते 22 सप्टेंबरदरम्यानच्या भारत गौरव ट्रेनची तिकीटं बुक करायची आहेत. तर, या ट्रेनच्या इकोनॉमी क्लासचं भाडं आहे माणसी 18460 रुपये.
वरील रकमेत स्लीपर क्लास ट्रेन तिकीट, हॉटेल मुक्काम यांचा समावेश आहे. तर, थर्ड एसी कोचचं भाडं माणसी 30480 रुपये इतकं आहे. कम्फर्ट कॅटेगरीचं भाडं माणसी 40300 रुपये इतकं असून इतकी मोठी रक्कम भरण्यास ज्यांना अडचणी येतात त्यांच्यासाठी EMI हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
भारत गौरव रेल्वेनं प्रवास करताना, तिकीट काढतेवेळी प्रवाशांना LTC आणि EMI अशाही सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी आयआरसीटीसीनं अनेक सरकारी आणि खासगी बँकांसोबत भागिगारी केली आहे. IRCTC च्या वेबसाईटच्या माध्यमातून या ट्रेनच्या तिकीटांचं आरक्षण करता येऊ शकतं. हे आरक्षण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर करण्यात येईल.






























