वीज खंडितीने ग्रामस्थ हैराण; मुळशी तालुक्यात (उ.बा.ठा) युवासेनेचा महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
मुळशी : मुळशी तालुक्यातील मुठा व मोसे खोऱ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुळशी तालुक्याच्या वतीने भरे येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता सतीश के. सुरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. वीज गेल्यानंतर ग्रामस्थ तक्रार करत असले तरी संबंधित वायेरमन वेळेवर सहकार्य करत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी दीर्घकाळ सोडवण्यात येत नाहीत. काही वेळा तर २४ तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित राहतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अमित कुडले, नामदेवआप्पा टेमघरे, दत्ताभाऊ काळभोर, साईदासभाऊ शिंदे, प्रदीप बोंद्रे तसेच शाखा प्रमुख विजय मारणे आदी उपस्थित होते.
महावितरण विभागाने विशेष पथक तयार करून या विभागातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या. तसेच सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला वायेरमन अपुरा पडत असल्याने, या विभागात एक अतिरिक्त वायेरमन नेमण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.
“वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण परिसरातील पाणी टंचाई निर्माण होते. यामुळे घरगुती वापरापासून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. मागण्या मान्य न झाल्यास युवासेना ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबेल,” असा इशारा युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी दिला.
महावितरणने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी आणि तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांसह युवासेनेने केली आहे.


































