मुळशी : लवळे (ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत गेल्या १५ दिवसांपासून चुकीच्या भूमापनाविरोधात आमरण उपोषण करत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाने २००६ साली केलेल्या मोजणीत त्यांच्या शेतातील घर चुकीच्या गटात दाखवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी त्यांनी सुरू केलेले उपोषण आता तिसऱ्या टप्प्यात असून त्यांच्या प्रकृतीवरही त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे समजते.
राऊत यांच्यासह त्यांच्या आई सिंधुबाई, पत्नी मीना, मुलगा तुषार, सून वृषाली, मुलगी रूपाली कुदळे, जावई संदीप कुदळे व इतर कुटुंबीय मिळून उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणाला ९ जूनपासून सुरुवात झाली असून, गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण कुटुंबाने अन्नत्याग करून आंदोलन तीव्र केले आहे. राऊत यांनी औषधांचाही त्याग केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
राऊत यांनी सांगितले की, “२००६ साली हेमंत निगडे या मोजणी अधिकाऱ्याने जाणूनबुजून माझे घर दुसऱ्याच्या गटात दाखवले. मी गेली १४ महिने या अन्यायाविरोधात लढा देतो आहे. आतापर्यंत एकाच जागेची चार वेळा मोजणी झाली असून प्रत्येक वेळेस वेगवेगळे निकाल देण्यात आले. यामध्ये मोठी गडबड आहे.”
यापूर्वी न्यायालयाने देखील मोजणीतील त्रुटींवर बोट ठेवले असून, शासकीय नकाशात स्पष्ट हद्दी असताना अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. “मागील मोजणीतील नकाशानुसारच पुढील मोजणी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात भूमी अभिलेख मुळशीच्या उपअधीक्षक स्वप्ना पाटील म्हणाल्या, “राऊत यांची मोजणी भोर येथील कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून योग्य निर्णय देतील.”
दरम्यान, जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली असून, “तपासणी करून निर्णय घेण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले आहे.
लवळे ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक गुजर यांनी देखील या प्रकरणात पारदर्शक तपासणी करून राऊत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. “एकच मोजणी पुन्हा पुन्हा करणे आणि प्रत्येकवेळी वेगळा निकाल देणे म्हणजे गंभीर बाब आहे. यामध्ये सत्य काय आहे, हे शोधून योग्य तो निर्णय व्हावा,” असे ते म्हणाले.
राऊत यांच्या या संघर्षामुळे संपूर्ण मुळशी तालुक्यात या प्रकरणाची चर्चा असून, सरकारी यंत्रणेकडून योग्य न्याय दिला जावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


































