महाराष्ट्र शासनाच्या ‘हंड्रेड डेज’ कार्यक्रमांतर्गत दर्यापूर तालुक्यात ‘जिवंत सात-बारा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत तालुक्यातील ८४६ शेतकरी मृत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ २१९ वारसांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले आहेत.
?
दर्यापूर तालुक्यात एकूण ५५,२१५ शेतकरी आहेत. तालुक्यात ८१,४८३.०२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी ७५,२२९ हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत सातबारावरील माहिती अद्ययावत केली जात आहे.
तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. सर्व तलाठी गावागावात बैठका घेत आहेत. वारसांच्या नोंदीसाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. वारसांची नावे सातबारावर समाविष्ट केली जाणार आहेत. शेतजमिनीच्या दैनंदिन व्यवहारांसाठी सातबारावर वारसांची नोंद महत्त्वाची असते. विहित कालावधीत ही नोंद न झाल्यास अनेक अडचणी येतात. या मोहिमेमुळे वारसांना प्रशासकीय कामांसाठी होणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.































