नागरिक त्रस्त | शाळकरी मुले, वयोवृद्धांचा प्रश्न गंभीर | महापालिका ढिम्म
कोथरूड (प्रतिनिधी) : डावी भुसारी कॉलनीजवळ एकलव्य कॉलेज ते पुणे-बेंगळूर महामार्गाला जोडणारा डीपी रोड गेली अनेक वर्षे केवळ नकाशातच अस्तित्वात आहे. या मुख्य रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून अकलूज शाळेजवळील कच्च्या रस्त्याचा वापर सुरू केला. मात्र या पर्यायी रस्त्यावर साचलेला कचरा आता नवे संकट बनले असून, नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे.
या कच्च्या रस्त्यावरून दररोज नागरिक, शाळकरी मुले आणि वयोवृद्ध प्रवास करतात. दोन ते तीन शाळा या मार्गालगत असल्यामुळे शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळेत मोठी वर्दळ असते. आधीच खडतर रस्ता आणि त्यात भर म्हणून दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याचा ढीग यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि अपघाताचा धोका वाढला आहे.
महापालिकेकडे वारंवार मागणी निष्फळ
स्थानिक नागरिकांनी अनेकदा पुणे महापालिका कर्मचाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासनच मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
“आम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी कचरा उचलावा, हीच मागणी करत आहोत. पण तीही पूर्ण होत नाही. दुर्गंधीमुळे मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते” असे स्थानिक रहिवासी सांगतात.
निवडणुकीनंतर काम थांबले?
ऑक्टोबर महिन्यात माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देत सफाई अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्ता स्वच्छ केला होता. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे तातडीने कारवाई झाली. पुढील दोन महिन्यांपर्यंत नियमित सफाई झाली, पण त्यानंतर मात्र पुन्हा दुर्लक्ष सुरू झाले आहे.

रस्ता की कचऱ्याचे ढीग?
या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या वाहनांना वाट काढावी लागते. पादचाऱ्यांना तर उघड्या कचऱ्यावरून चालावे लागते. कचऱ्यामुळे उंदीर, कुत्री यांची संख्याही वाढली असून नागरिकांना आरोग्याच्या नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. काही बेजबाबदार नागरिक या रस्त्यावर थेट घरोघरीचा कचरा आणून टाकत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
‘स्वच्छता’चे गाजावाजा… पण काम कुठे?
एकीकडे पुणे महानगरपालिका ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात सहभागी होत देशपातळीवरील सन्मानासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिक बेसिक सफाईसाठी भांडत आहेत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
नागरिकांची मागणी काय?
• आठवड्यातून किमान एकदा कचरा उचलावा
• येथे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी
• रस्त्याची तात्पुरती तरी दुरुस्ती करावी
• महापालिकेने नियमित निरीक्षण करावे
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून किमान स्वच्छता तरी सुरळीत करावी, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

































