लग्नाच्या चारच दिवसांत सासरच्या मंडळींनी ‘तू आमच्या घरात शोभत नाही’ असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेस अपमानित करत छळ सुरू केला. त्यामुळे एक वर्ष छळ सहन करून वैतगलेल्या विवाहितेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
?
सीमा (नाव बदललेले) हिचा सिंधी कॉलनीमध्ये राहणाऱ्या करणजित छाबडा यांच्याशी २७ मे २०२४ रोजी जालना येथे विवाह झाला. त्या वेळी नणंद लग्नाला आल्या नव्हत्या. सीमाचे आई-वडील गरीब आहेत, हे पाहून नणंद हॉटेलमध्ये जाऊन राहिली. तिथूनच या वादाला सुरुवात झाली. लग्नाच्या चारच दिवसांत नणंद आपल्यासोबत राहत नाही यावरून सासू व नवऱ्याने भांडण सुरू केले. नणंदेने घरच्या वाटणीचा मुद्दा काढला. त्या वेळी सासू व नणंद तुझ्या आईचे घर विकणार आहे. त्यातून २० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत असे. पैसे देणे शक्य नसल्याने तू गरीब आहे, आमच्या घरात शोभत नाही, असे म्हणून वारंवार अपमानित करत होते.
या कारणावरून पती-पत्नीचे वादही वाढत होते. त्यामुळे ते वेगळा फ्लॅट घेऊन राहू लागले. दरम्यान, सासू नेहमी सीमाच्या पतीला फोन करून तुझ्या बायकोला माहेरहून पैसे आणायला सांग असे सांगत असे. त्यावरून पती सीमाला टोमणे मारायचा. तिला मारहाण करत होता. १६ मार्चला सासूने फोनवर माहेरहून पैसे आणले नाही तर तिला सोबत ठेवू नको, असे सांगितले. त्यामुळे पतीने सीमाला मारहाण करून घरातून हाकलून लावले. तिने माहेरी जात आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी भरोसा सेलमध्ये अर्ज केला. परंतु कोर्टात घटस्फोटाचा अर्ज असल्याने तिथे तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे सीमाने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास उपनिरीक्षक संजय बनकर करत आहेत.
घटस्फोटाचा अर्ज केल्यावरही दिली संधी
सासरच्या छळाला कंटाळून सीमाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्या वेळी समुपदेशकांच्या माध्यमातून पती-पत्नीमधील वाद मिटवण्यात आला होता. पुढे आपला संसार चांगला व्हावा यासाठी सीमाने एक संधी दिली. मात्र तरीही सासू व नणंदेच्या कुरापती सुरू राहिल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.































