माझी इतिहासात जाऊन मुघल बादशहा औरंगजेब याच्या कानशिलात 2-3 भडकावण्याची इच्छा आहे, असे मत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याने येथे बोलताना व्यक्त केले आहे.
?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिकचा गल्ला गोळा केला आहे. या चित्रपटात विक्की कौशलने शंभूराजे व अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका निभावली. या दोघांच्याही भूमिकांची देशभरात वाहवा होत असताना विजय देवरकोंडा यानी उपरोक्त विधान केले आहे. यामुळे छावा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडाने नुकतीच हैदराबाद येथे सूर्याच्या आगामी रेट्रो चित्रपटाच्या प्री-रीलिज इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी त्याला पत्रकारांनी त्याला भूतकाळात परत जायचे असेल तर त्याला कोणत्या ऐतिहासिक व्यक्तींना भेटायला आवडेल असा प्रश्न केला होता. त्यावर विजयने कोणताही संकोच न बाळगता उपरोक्त उत्तर दिले.
मला इंग्रजांना अन् औरंगजेबाला मारायचे आहे
विजय देवरकोंडा म्हणाला, मला इंग्रजांना भेटायचे आहे. त्यांच्या कानशिलात दोन-चार हाणायच्या आहेत. मी नुकताच छावा चित्रपट पाहिला. त्यानंतर माझा संताप अनावर झाला. कदाचित मी औरंगजेबाच्याही दोन-तीन कानशिलात हाणील. मला भूतकाळातील अशा अनेक व्यक्तींना भेटायचे आहे. मला त्यांच्याशी संवाद साधायचा नाही, त्यांना केवळ मारायचे आहे. सध्यातरी माझ्या डोक्यात हेच आहे.
पत्रकारांनी यावेळी विजय देवरकोंडाला भूतकाळात परत जाऊन कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल? असा प्रश्न केला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने सिमरन व सोनाली बेंद्रे यांचे नाव घेतले. त्याने दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाचेही नाव घेतले.
उल्लेखनीय बाब म्हणजे छावा चित्रपटानंतर अनेक राजकारण्यांनी औरंगजेबाविषयी वादग्रस्त विधाने केली. काहींनी तर थेट त्याची खुलताबाद येथील कबरच उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या इशाऱ्यानंतर सध्या खुलताबाद येथील त्याच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा…
मंत्रालयात अजूनही धनंजय मुंडेंचा मंत्री म्हणून उल्लेख:अंजली दमानिया यांचा आरोप; म्हणाल्या – मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशाला?
मुंबई – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याला जवळपास 2 महिने होत आलेत. पण मंत्रालयात अजूनही त्यांच्या नावाचा उल्लेख मंत्री म्हणून केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याकडे अंगुलीनिर्देश करत मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? असा खडा सवाल उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर





























