केडगावातील भूषणनगर येथे वैराग्यमूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या वाणीतून श्रीकृष्ण लिला कथा ऐकण्यासाठी पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार भाविकांनी हजेरी लावली.
?
शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळातर्फे श्रीकृष्ण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथा वाचनाची सुरुवात मंगल वाद्यांच्या गजरात आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी केडगाव पत्रकार संघातर्फे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिर्के महाराज, बबनराव मेहेत्रे, योगेश गुंड, नागेश सोनवणे, प्रसाद शिंदे, मकरंद घोडके, सूर्यवंशी गोवर्धन, संजय गारुडकर, विजयकुमार बोरुडे, विजय साळुंखे आदी आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, त्याची लीला आणि उपदेश यांचे वाचन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. कथा वाचनात बाललीला, गोवर्धन पूजन, गीता उपदेश यांसारख्या प्रसंगांना विशेष महत्त्व देण्यात आले. दिलीप सातपुते म्हणाले, श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्राचे वाचन व चिंतन करण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण हे धर्म, ज्ञान, भक्ती आणि प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या बाललीला आपल्या हृदयात निरागसतेचे बीज रोवतात, तर त्यांच्या गीतेतील उपदेश आयुष्याला योग्य दिशा देतो. कथा वाचन हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही, तर तो एक साधना आहे. भाविकांना महाप्रसादाचा वाटप संपर्कप्रमुख दिलीप सातपुते व ओंकार सातपुते परिवाराच्या वतीने करण्यात आले. दररोज सायंकाळी विविध कथांचे वाचन आणि चिंतन होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.
तसेच कार्यक्रमात सहा दिवस दिलीप सातपुते मित्र मंडळ व अर्पण ब्लड बँक यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम देखील यावेळी राबवित आहेत.
श्रीकृष्ण कथांतून धर्म पालन करण्याची प्रेरणा श्रीकृष्णाच्या कथांमधून आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन मिळते. संकटसमयी धैर्य, मोहसमयी विवेक आणि जीवनात सदैव धर्माचे पालन करण्याची प्रेरणा आपण या कथांमधून घेतो.या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की, आपण श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकून आपल्या आचार-विचारात त्याचा अमल करावा. हे वाचन आपल्याला बाह्य जीवनातच नव्हे तर अंतर्मनातही शांती आणि आनंद मिळवून देईल, असे दिलीप सातपुते यांनी सांगितले.
































