निक्की भाटी खून: भारतात हुंडाबंदीच्या सहा दशकांनंतरही अद्याप ही प्रथा सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीपासून एका तासापेक्षा कमी अंतरावर वास्तव्यास असणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेला हुंड्यासाठी पती आणि आईकडून जिवंत जाळण्यात आलं. निक्कीवर तिच्या आई-वडिलांकडून 36 लाख रुपये हुंडा मागितला जात होता. याच कारणास्तव तिला जाळण्यात आलं.
‘नोटाबंदीच्या काळात लग्न झालं’
निक्की भाटीचे वडील भिकारी सिंग पायला यांच्याशी एनडीटीव्हीने संवाद साधत हुंडा मागणाऱ्या कुटुंबात मुलींचं लग्न का लावून दिलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने कायदे आणि वास्तवातील अंतर स्पष्ट केलं. “आमच्या कुळात, विवाह (हुंडा) मध्यस्थांद्वारे व्हायचे. मी माझ्या मुलीचे लग्न चांगल्या पद्धतीने केलं होतं. 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात हे लग्न झालं,” असं त्यांनी उत्तर दिले.
‘अखेरची मागणी 36 लाख रुपये’
पायला यांनी 10 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या मुली निक्की आणि कांचन यांचे लग्न विपिन आणि रोहित या भावांशी लावून दिलं. लग्नादरम्यान, कुटुंबाने त्यांच्या जावयांना एक स्कॉर्पिओ एसयूव्ही, रोख रक्कम आणि सोनं भेटवस्तू म्हणून दिलं होतं. परंतु कालांतराने मागण्या वाढत गेल्या आणि अखेरची मागणी 36 लाख रुपये होती. गुरुवारी संध्याकाळी निक्की आणि विपिनमध्ये वाद झाला. त्याने तिच्यावर हल्ला केला आणि त्याची आई दयाच्या मदतीने तिला जाळून टाकल्याचा आरोप आहे. विपिन, त्याचा भाऊ रोहित आणि आईवडील दया आणि सत्यवीर यांना अटक करण्यात आली आहे.
‘जन्माष्टमीच्या दिवशीही झाली होती मारहाण’
फेब्रुवारीमध्ये विपिनने हल्ला केल्यानंतर ती, कांचन आणि त्यांची मुले सासरच्या घरातून निघून त्यांच्या माहेरी आल्या होत्या असा खुलासा निक्कीच्या कुटुंबाने केला आहे. परंतु दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आणि विपिनने माफी मागितल्यानंतर, बहिणी परतल्या होत्या. जन्माष्टमीच्या दिवशीही अशीच एक घटना घडली. पुन्हा मारहाण झाल्याचं समजल्यानंतर निक्कीचे वडील आणि इतर नातेवाईक भाटींच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा तडजोड झाली आणि निक्की तिथेच राहिली.
‘समाजातील आणि कुळातील सदस्यांचे ऐकले पाहिजे’
निक्कीवर अत्याचार होत असल्याचे माहित असतानाही तिला आपल्यासोबत का नेलं नाही? असं विचारलं असता पायला म्हणाले, “आपल्या समाजाचे आणि कुळातील सदस्यांचे ऐकले पाहिजे.” न्यायाची मागणी करताना ते म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्यांना फाशी द्यावी.”
‘त्यांनी तिला जिवंत जाळलं आणि संपूर्ण कुटुंब पळून गेले’
डोळ्यातून अश्रू वाहत असतानाही पायला यांनी गुरुवारी जगलेल्या भयानक घटनेची कहाणी सांगितली. “त्यांनी तिला जिवंत जाळलं आणि संपूर्ण कुटुंब पळून गेले. माझी एक मुलगी जळत होती, तर दुसरी बेशुद्ध पडली होती. आणि ते सर्व पळून गेले. एका शेजाऱ्याने माझ्या मुलीला फोर्टिज रुग्णालयात नेले. माझी मोठी मुलगी (कांचन) फोन करून मला म्हणाली, ‘बाबा, निक्कीला जाळलं आहे’. आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि डॉक्टरांनी ती 70 टक्के भाजली असल्याचं सांगितलं. तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. आम्ही तिला रुग्णवाहिकेत घेऊन तिथे पोहोचलो. आम्ही दरवाजातून आत गेलो आणि तिने शेवटचा श्वास घेतला. डॉक्टर म्हणाले की आता काहीही शिल्लक नाही. मी सर्व काही गमावले आहे. मी माझी मुलगी गमावली आहे, आता काय शिल्लक आहे?”
निक्कीचा सात वर्षांचा मुलगा, ज्याने त्याच्या आईला जिवंत जाळतानाचे वेदनादायक दृश्य पाहिले होते, तो आता तिच्या पालकांसोबत आहे. “मी त्याला शक्य तितके चांगले वाढवीन. तो दररोज संध्याकाळी त्याच्या आईबद्दल विचारून रडतो. तो म्हणतो, ‘त्यांनी माझ्या आईला जाळले’. आम्ही त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो,” असं त्यांनी जड अंतकरणाने सांगितलं.
विपिन आणि रोहित बेरोजगार होते आणि त्यांच्या वडिलांच्या किराणा दुकानावर उदरनिर्वाह करत होते असं निक्कीच्या कुटुंबाने सांगितलं आहे. जेव्हा निक्की आणि कांचन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पार्लर आणि बुटीक व्यवसाय करत होत्या तेव्हा भावांनी त्यांच्या कमाईतून चोरी करण्यास सुरुवात केली, असं त्यांच्या कुटुंबाने सांगितलं आहे. यामुळे घरी वारंवार भांडणे होत असत आणि गुरुवारी अशाच एका भांडणाचा शेवट निक्कीच्या निर्घृण हत्येने झाला.
FAQ
1) निक्की भाटी हत्याकांड काय आहे?
निक्की भाटी, वय २८, ही उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी तिच्या सासरच्यांनी मारहाण करून जिवंत जाळल्याने मृत्यूमुखी पडली. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. तिचा पती विपिन भाटी, सासू दया भाटी, सासरे सत्यवीर भाटी आणि जेठ रोहित भाटी यांच्यावर हत्येचा आणि हुंडा प्रताडनेचा आरोप आहे.
2) निक्की भाटीला का मारण्यात आले?
निक्कीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी ३६ लाख रुपये आणि लक्झरी कारच्या हुंड्याची मागणी केली होती. निक्की आणि तिची बहीण कंचन (जिचे लग्न विपिनचा भाऊ रोहितशी झाले आहे) यांना लग्नानंतर (१० डिसेंबर २०१६) सतत हुंड्यासाठी छळले गेले. निक्कीने स्वतःचा पार्लर चालवला आणि इन्स्टाग्रामवर रील्स बनवले, ज्याचा तिच्या पतीला आणि सासरच्यांना विरोध होता, यामुळेही तणाव वाढला.
3) हत्याकांड कसे घडले?
२१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी, निक्कीला तिचा पती विपिन आणि सासू दया यांनी मारहाण केली. कंचनच्या FIR नुसार, विपिनने निक्कीवर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि आग लावली. निक्कीला ७०% जखमांसह प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले, परंतु ती वाचू शकली नाही. निक्कीच्या ६ वर्षांच्या मुलाने ही भयानक घटना पाहिली आणि सांगितले की, “त्यांनी मम्मीवर काहीतरी ओतले, तिला मारले आणि लायटरने आग लावली.”
































