मुळशी (पौड,दि.23) : मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्यात यावी, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (ऑडिओ व व्हिडिओसहित) बसवावेत, अशी मागणी ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचालित माहिती अधिकारी नागरी समूहाने केली आहे.
या संदर्भात तालुका अध्यक्ष मधुकर थोरवे, पुणे शहर प्रचारप्रमुख संदीप जोरी आणि तालुका संघटक अनिल सपकाळ यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन दिले. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर गैरहजर राहत असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. यामुळे शासकीय कारभारात अकार्यक्षमता आणि नागरिकांच्या मनात नाराजी निर्माण होते.
ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केली जावी, तसेच ये-जा वेळेचे अचूक पंचिंग व्हावे, अशी या संस्थेची भूमिका आहे. याशिवाय अनेकवेळा कर्मचारी व नागरिकांमध्ये गैरवर्तणुकीचे प्रकार घडत असून, दोन्ही बाजूंनी असभ्य भाषेचा वापर होत असल्याने कार्यालयीन वातावरण बिघडते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
काही ग्रामपंचायतींनी शासनाच्या परिपत्रकाला धाब्यावर बसवून कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवल्या असून, त्या देखभालीसाठी येणारा अतिरिक्त वीजबिलाचा भार करदात्यांच्या खिशातून वाया जात असल्याची टीकाही संस्थेने केली आहे. या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


































