खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्
?
खगोलविज्ञानासारख्या किचकट विषयात पथदर्शी संशोधन करत आपल्या सहजसोप्या लेखनातून सर्वसामान्यांना विज्ञानाची गोडी लावणाऱ्या जयंत नारळीकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत नारळीकरांना कोणताही गंभीर आजार नव्हता. पण वयोमानानुसार त्यांची प्रकृती काहीशी कमी – जास्त होत होती. त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. यामुळे ते खचले होते. त्यातच 2 आठवड्यांपूर्वी पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. यासंबंधी त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना त्यांनी मंगळवारी पहाटे झोपेतच अखेरचा श्वास घेतला.
जयंत नारळीकर यांच्या पश्चात 3 मुली व नातवंडे असा परिवार आहे. परदेशात वास्तव्यास असलेली मुलगी आल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
कोल्हापुरात झाला होता जन्म
डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ व वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. तर आई सुमती ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचा विवाह 1966 साली मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरीजा व लीलावती अशा 3 कन्या या दाम्पत्याला आहेत.
सहजसोप्या भाषेत विज्ञानाची साहित्य निर्मिती
जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीतच झाले. 1957 साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1972 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर 1988 मध्ये त्यांची पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्य कळवीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. विविध मराठी नियतकालिकांतून त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत. या माध्यमातून त्यांनी देशभरात विज्ञान प्रसरणाची ज्योत पेटवली. त्यांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत.
जगभरात संशोधन कार्याची घेतली गेली दखल
डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. भारत सरकारने खगोल क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाविषयी 1965 मध्ये त्यांचा पद्मभूषण, तर 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. याशिवाय त्यांनी रँग्लर या पदवीसह खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतरही अनेक सन्मानांवर आपली मोहोर उमटवली आहे. नारळीकरांनी जागतिक पातळीवरही शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले.
जयंत नारळीकरांनी केवळ संशोधन क्षेत्रातच कार्यरत न राहता लेखनाच्या माध्यमातूनही विज्ञानवादाचा प्रसार केला. त्यांची ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘सूर्याचा प्रकोप’ ही पुस्तके चांगलीच गाजली. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
हे ही वाचा…
नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला होता दावा
मुंबई – ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एका कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान हिरा हरवला. नारळीकरांनी आपले संशोधन कार्य करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंबंधीची सुप्रसिद्ध बिगबँग थेअरी नाकारली. यासाठी त्यांनी दिलेले युक्तिवाद अत्यंत चपखल असे मानले जातात. त्यांनी 2017 मध्ये ‘कलाचूवाडू’ या तामिळी मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत यासंबंधी आपले विस्तृत मत मांडले होते. वाचा सविस्तर































