भारताने दुसऱ्या T20 विश्वचषक 2026 सामन्यापूर्वी सराव सत्र का रद्द केले: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप ‘A’ मध्ये भारत आणि नामीबिया यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा या स्पर्धेतील भारतीय संघाचा दुसरा सामना असेल. मात्र या लढतीपूर्वी टीम इंडियाने दिल्लीत आपलं पहिलं नियोजित सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नामीबियाविरुद्धच्या सामन्याआधी, सोमवारी अरुण जेटली स्टेडियमवर ठेवण्यात आलेलं ऑप्शनल ट्रेनिंग सेशन भारतीय संघाने टाळलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या निर्णयामागचं ठोस कारण अद्याप अधिकृतरीत्या सांगण्यात आलेलं नाही. मात्र मैदानाच्या उपलब्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 10 फेब्रुवारी रोजी नामीबिया आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ याच मैदानावर सराव करणार आहेत. नामीबिया संघ सकाळच्या सत्रात, तर नेदरलँड्स संघ संध्याकाळच्या सत्रात सराव करेल.
काय आहे अधिकृत निवेदनात?
दरम्यान, बीसीसीआयने नंतर अधिकृत निवेदन जाहीर करत स्पष्ट केलं की हा भारतीय संघासाठी विश्रांतीचा दिवस होता. त्यामुळे कोणताही सराव किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली नव्हती. मंगळवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत टीम इंडिया अरुण जेटली स्टेडियमवर सराव करणार आहे.
हे ही वाचा: पाकिस्तानची कुरघोडी? भारताविरुद्ध T20 World Cup सामना खेळण्यासाठी ICC समोर ठेवल्या तीन मोठ्या अटी
गंभीरच्या घरी जेवणाचा कार्यक्रम
याआधी रविवारी रात्री संपूर्ण भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी एकत्र जेवणासाठी जमला होता.
हे ही वाचा: Under 19 World Cup जिंकूनही टीम इंडियाला ICC कडून प्राइज मनी नाही, कारण काय? जाणून घ्या
विजयासह भारतीय संघाची दमदार सुरुवात
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईत अमेरिकेविरुद्ध शानदार विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. मात्र सामन्याच्या पहिल्या टप्प्यात अमेरिकेने भारतीय संघाला चांगलंच अडचणीत टाकलं होतं. एका टप्प्यावर भारताची अवस्था 77 धावांत 6 विकेट अशी झाली होती.
अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत 49 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावांची झुंजार खेळी केली आणि भारताचा स्कोअर 20 षटकांत 9 बाद 161 धावांपर्यंत नेला.
हे ही वाचा: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये वाद? BCCI सेक्रेटरीने देवजीत सैकियांनी अखेर सोडले मौन
लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या क्षणी संघात सामील झालेल्या मोहम्मद सिराजने 29 धावांत 3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीला एक यश मिळालं.






























