आयएमडी हवामान अद्यतनः मागील कैक दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये निसर्गाच्या रौद्र रुपानं नागरिकांनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं असून, या राज्यांमध्ये पर्यटनाच्या हेतूनं जाणाऱ्यांच्याही मनात धडकी भरवली आहे. पंजाबपासून (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशपर्यंत हवामान प्रचंड बिघडलं असून, पावसामुळं या भागांतील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं नद्यांचा समुद्र झालायं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 24 तासांसाठी हिमाचल प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, राज्यातील 9 जिल्ह्यांमधील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनानं दारी केले आहेत. सध्या हिमाचलमध्ये कुल्लू भागात सैन्याच्या चिनूक हेलिकॉप्टरनं मदत पोहोचवली जात असून, चंडीगढ मनाली महामार्ग दुरूस्त करण्याचं कामही सैन्याच्या तुकडीनं हाती घेतलं आहे.
बहुतांश भागांमध्ये भूस्खलन झाल्या कारणानं हिमाचल प्रदेशातील अनेक रस्ते अद्यापही बंद आहेत. धारचूला इथंही डोंगरावरून मोठाले दगड कोसळत असल्या कारणानं या भागात न जाण्याचा सल्ला प्रशासनानं दिला आहे. उत्तराखंडमध्येही चित्र वेगळं नसून, येथील पर्वतीय भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळं नदीपात्रांनी रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामुळं या राज्यात येणाऱ्या पर्यटकांना तूर्तात त्यांचे बेत रद्द करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीचा धोका?
हवामान विभागानं जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीचा इशारा जारी केला आहे. ज्यामुळं इथं पूर येण्याची शक्यता आहे. या भागात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा असल्या कारणानं सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसानंतर (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि सांबा इथं जमीन खचण्याची घटना घडल्यामुळं 19 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
पंजाबलाही पावसाचा मारा; कोणता इशारा जारी?
पंजाबमध्ये पुढील 24 तासांमध्ये 8 जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालंधर, लुधियानासह राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असल्यानं इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामुळं 3 सप्टेंबरपर्यंत पंजाबमध्ये शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरच उत्तर भारतामध्ये पावसाचा मारा अतिप्रचंड प्रमाणात वाढल्यानं नदीपात्रांमध्ये पाण्याची पातळी भयंकर प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळं नदीकाठच्या भागांसह पर्वतीय भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. +
FAQ
उत्तर भारतातील सध्याची हवामान परिस्थिती काय आहे?
उत्तर भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये, मागील काही दिवसांपासून अतिमुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
हिमाचल प्रदेशात कोणत्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी आहे?
हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील उना, हमीरपूर, बिलासपूर, कांगडा, मंडी आणि सिरमौर या सहा जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमधील हवामान परिस्थिती काय आहे?
उत्तराखंडमधील पर्वतीय भागांमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. देहरादून, टिहरी, पौडी आणि हरिद्वार येथे रेड अलर्ट जारी आहे, तर अन्य जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे.































