कर्नाटकातील शिवमोगा येथील एका आंतरधर्मीय जोडप्याचे वैवाहिक जीवन एका रात्रीत पतीच्या हत्येने क्रूरपणे संपलं. महिलेने दिलेल्या कबुलीजबाबामुळे तिच्या खुनाच्या कटाचा उलगडा झाला. विशेष म्हणजे हा प्लॅनिंगचा भाग नव्हता. ही घटना 2016 मध्ये भद्रावती शहरात घडली, जिथे हे जोडपे दोघेही सरकारी शिक्षक म्हणून काम करत होते. लग्नानंतर काही वर्षांनी ते स्थलांतरित झाले होते.
लव्ह स्टोरी
2005 मध्ये, पदवीधर असलेल्या 30 वर्षीय इम्तियाज अहमदची कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याच सुमारास, लक्ष्मीचीही त्याच शाळेत नियुक्ती झाली. त्यानंतर लवकरच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तथापि, ते वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं नाही. 20111 मध्ये दोघांनी लग्न रजिस्टर केलं.
काही महिन्यांनंतर, त्यांच्या कुटुंबियांना लग्नाची माहिती मिळाली. परंतु कोणीही त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. या जोडप्याला एक बाळदेखील झालं. 2014 मध्ये, लक्ष्मीची आई आजारी पडली आणि तिने तिला शिवमोग्गा येथील भद्रावती तालुक्यात बदली करण्याची विनंती केली. लक्ष्मीची लवकरच बदली झाली, परंतु इम्तियाजची विनंती मान्य झाली नाही.
लक्ष्मीने भद्रावतीमध्ये एक घर भाड्याने घेतले आणि तिथेच राहू लागली. 2016 पर्यंत, इम्तियाजचीही बदली झाली, परंतु मध्यंतरी बरंच काही घडले, ज्याचा परिणाम त्याच्या मृत्यूमध्ये झाला.
गुन्ह्याची कबुली
8 जुलै 2016 रोजी, इम्तियाजचा मोठा भाऊ एजाज अहमद याला लक्ष्मीचा फोन आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “लक्ष्मीने त्याला सांगितलं की इम्तियाज तिला दररोज मारहाण करत असल्याने आणि त्रास देत असल्याने तिने त्याची हत्या केली. तिने मुलाच्या भविष्यासाठी त्याच्याकडून संरक्षण आणि पाठिंबा मागितला आणि हे प्रकरण कोणालाही सांगू नये अशी विनंती केली.” पण एजाजने ताबडतोब पोलिसांना कळवलं.
याच्या दहा दिवसांपूर्वी, स्थानिक प्रकरणावरून भद्रावतीच्या न्यू टाउन पोलिस स्टेशनमधील निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं आणि टी के चंद्रशेखर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. “जेव्हा एजाजने आम्हाला कळवलं तेव्हा आम्ही लक्ष्मीच्या घरी धाव घेतली पण आम्हाला ते सापडले नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
“लक्ष्मीने दावा केला की तिने तिच्या पतीची हत्या केली, परंतु आमच्याकडे मृतदेह नव्हता, ना आरोपी. इम्तियाजची हत्या झाली आहे की नाही हे आम्हाला निश्चितपणे माहित नव्हते,” असं चंद्रशेखर म्हणाले.
तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यानंतर त्यांनी महिलेच्या मोबाईल फोन लोकेशनचा मागोवा घेतला. “आम्हाला लक्ष्मी आणि तिचा प्रियकर कृष्णमूर्ती भद्रावती शहरात सापडले जिथे ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते,” असं अधिकाऱ्याने सांगितलं.
क्रूर हत्या
अटकेनंतर, पोलिसांनी लक्ष्मी आणि कृष्णमूर्ती यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली असता त्यांनी खरोखरच इम्तियाजची हत्या केल्याचं उघड झालं. याचं कारण तो नात्यात अडथळा ठरत होता.
चंद्रशेखर म्हणाले की दोघांनीही खून करण्याचा कट रचला होता. “7 जुलै 2016 रोजी इम्तियाज कामावरून घरी परतला आणि जेवला. त्याला जेवणात औषधे मिसळली आहेत याची कल्पना नव्हती. तो झोपी गेल्यानंतर, कृष्णमूर्ती आणि लक्ष्मीने त्याला लोखंडी पाईप आणि हातोड्याने मारून ठार मारलं. कृष्णमूर्तीचा भाऊ शिवराजू नंतर मृतदेह नेण्यासाठी इनोव्हा कारमधून आला. त्यांनी मृतदेह बेडशीटमध्ये झाकला आणि नायलॉनच्या दोरीने बांधला. नंतर तो भद्रा नदीत फेकून देण्यात आला,” असं अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी 9 जुलै रोजी मृतदेह बाहेर काढला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये दिसून आले की इम्तियाजवर जाड वस्तूंनी वार करण्यात आला. घरातून जप्त केलेल्या शस्त्रांशी त्याच्या जखमा जुळत होत्या, असं पोलिसांनी सांगितले.
चंद्रशेखर म्हणाले, “इम्तियाजला मारल्यानंतर लक्ष्मी चिंतेत होती आणि तिला पकडलं जाण्याची भीती वाटली. तिला वाटलं की जर तिने त्याच्या भावाला कारणं सांगितली तर त्याला पटेल. परंतु तिच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत”
प्रेमसंबंधामुळे क्रूर गुन्हा
लक्ष्मी आणि कृष्णमूर्ती हे बालपणीचे मित्र होते आणि ती भद्रावतीला परतल्यानंतर पुन्हा एकमेकांना भेटले, असे पोलिसांनी सांगितले. या मैत्रीचे लवकरच प्रेमसंबंधात रूपांतर झाले. कृष्णमूर्ती लक्ष्मीच्या घराशेजारी राहत होता आणि जेव्हा इम्तियाज आठवड्याच्या शेवटी येत असे तेव्हा संशय येऊ नये म्हणून तिने त्याला तिचा नातेवाईक म्हणून ओळख करून दिली.
तथापि, इम्तियाजला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने कृष्णमूर्तीला बोलावून तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला. लक्ष्मीच्या वकिलांनी असाही आरोप केला की इम्तियाजने त्याच्या पत्नीला त्याच्या वतीने बँक कर्ज घेण्यास भाग पाडले, परंतु पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला.
हत्या उघडकीस आल्यानंतर, लक्ष्मी आणि कृष्णमूर्ती यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून हे पूर्वनियोजित असल्याचे दिसून आले, असे पोलिसांनी सांगितले. 30 जून ते 8 जुलैदरम्यान त्यांच्यात चर्चा झाल्याचं पुराव्यातून सिद्ध झाले. ज्यामध्ये हत्येचे प्लॅनिंग करण्यात आले होते. एकमेकाला वाचवण्यासाठी पोलिसांना शरण जाण्यासही ते तयार होते. एकूण 201 चॅट पोलिसांकडे देण्यात आले.
या वर्षी २३ ऑगस्ट रोजी, भद्रावती येथील चौथ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. लक्ष्मी (२९) आणि कृष्णमूर्ती (३०) यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर शिवराजू (३२) याला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. भद्रावतीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात न्यायाधीशांनी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.






























