अहमदाबाद विमान क्रॅश: 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 241 जण विमानात होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान कोसळले. इंजिन फेल, इंजिनमध्ये पक्ष्यांचा थवा अडकण, विमानाची यंत्रणा हॅक करण? असे अनेक तर्क लावले जात आहेत. या विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून यातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत दिवसेंदिवस अनेक खुलासे होतायत. प्रत्यक्षदर्शीं याबद्दल उलगडा करत आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
घटना कशी घडली?
एअर इंडियाचे विमान एआय-171 अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी पूर्णपणे तयार होते आणि विमानानेही उड्डाण घेतले होते.पण पुढच्या 30 सेकंदातच विमानात काही भयानक बिघाड झाला. ज्यामुळे विमान जवळच्या मेघानी नगरमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातानंतर जवळपास उपस्थित असलेले लोक घटनास्थळी धावले. विमानात 70 टक्के लोक त्यांच्या जागांवर उपस्थित होते आणि जवळजवळ सर्वांनी सीट बेल्ट घातले होते, असे घटनास्थळी पोहोचलेल्या पहिल्या लोकांपैकी एकाने सांगितले.
‘भूकंप झाल्यासारखे वाटले’
‘विमान कोसळताच भूकंप झाल्यासारखे वाटले. आम्ही ताबडतोब घटनास्थळी धावलो आणि तोपर्यंत परिसरातील इतर लोकही तिथे पोहोचले होते’, असे दुसऱ्या व्यक्तीने सांगितले. एका व्यक्तीने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार , ‘मला इमारतीतून दाट धुराचे लोट येत असल्याचे दिसले. त्यानंतर मी माझ्या मित्रांना फोन केला. त्यापैकी सुमारे 15-20 जण आले. मी त्यांना सांगितले की विमान कोसळले.’
रुग्णालयात नेत असताना 2 जणांचा मृत्यू
त्या व्यक्तीने सांगितले की, आम्ही ज्यांना वाचवले ते जिवंत होते, पण रुग्णालयात नेत असताना 2 जणांचा मृत्यू झाला. माझ्या मित्रांनी घटनास्थळावरून 20-25 विद्यार्थ्यांना वाचवले होते, असेही त्यांनी पुढे सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही इमारत एक वर्षापूर्वी निवासी डॉक्टरांसाठी बांधण्यात आली होती.’ घटनास्थळी क्रेनच्या मदतीने जळलेली झाडे काढण्याचे काम सुरू आहे आणि परिसरात जेट इंधनाचा तीव्र वासही पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
‘विमानाची यंत्रणा सायबर हल्ल्याने हॅक करणं शक्य’
तन्मय दीक्षित यांनी सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विमान अपघाताबद्दल बोलताना तांत्रिक बाबी समजून सांगितल्या. सायबर एक्सपर्ट असलेल्या तन्मय दीक्षित यांनी, “विमानावर सायबर हल्ला होऊ शकतो कारण ते एक मानवनिर्मित यंत्र आहे,” असं म्हटलं आहे. हे हॅकिंग कसं केलं जातं याबद्दल बोलताना, “विमानातील यंत्रांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी इन्स्क्रीप्शन सेटींग केलेले असतात. या इन्स्क्रीप्शनच्या सेटींगचा अॅक्सेस हॅकर्स, क्रिमिनल्सला मिळाले तर ते रिमोटली हाताळता येऊ शकतात,” असं स्पष्ट केलं. म्हणजेच त्रयस्त ठिकाणावरुन विमानातील यंत्रणा हातळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं दीक्षित यांनी सूचित केलं आहे.पुढे बोलताना, “विमानात ऑटो पायलेट मोड असतो. हा ऑटो पायलेट मोड अॅक्सेस करण्यासाठी हॅकर्स, क्रिमिनल्स ही सिस्टीम रिमोटली ब्रेक करु शकतात किंवा त्यावर हल्ला करु शकतात,” असं तन्मय दीक्षित यांनी म्हटलं आहे. तन्मय दीक्षित यांनी अशाप्रकारचं हॅकिंग कसं रोखता येईल याबद्दलचीही माहिती दिली आहे. “हे (विमानातील यंत्रणांचं हॅकिंग) टाळण्यासाठी सिक्युरीटी ऑडिटींग करणं, पेनिट्रेटींग टेस्टींग करणं हे अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला याच्या आधीसुद्धा अशाप्रकारे रिमोटली हॅकिंग करण्यात आलेलं आहे. विमानासंदर्भातील यंत्रणा सहज लक्षात येऊ शकते. रडार सिस्टीम असो किंवा एरोप्लेन असो याच्या सिग्नल सिस्टीम किंवा ऑन ऑफ सिस्टीम असो या नीट तपासणं, ऑडिट करणं हे खूप आवश्यक असतं,” असंही तन्मय दीक्षित यांनी म्हटलं आहे.































