रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता त्याचा उत्तराधिकारी कोण होणार यावरुन चर्चा रंगली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने यावर आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. आर अश्विनने 2024 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या भारतीय कसोटी संघाच्या कर्णधार पदावरुन सुरु असलेल्या स्पर्धेवर आर अश्विनने भाष्य केलं आहे. सुत्रांनुसार, इंग्लंड दौऱ्यात 25 वर्षीय शुभमन गिलकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा कर्णधार असताना उप-कर्णधार असणाऱ्या जसप्रीत बुमराहला डावललं जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहचं वय आणि फिटनेसच्या चिंतांमुळे शुभमन गिलला कर्णधारपदासाठी पसंती दिली जात आहे. जसप्रीत बुमरहाला डावललं जाण्याची शक्यता असल्याने दोघांसह खेळलेला त्यांचा एकेकाळचा सहकारी आर अश्विनने नाराजी जाहीर केली आहे.
“जसप्रीत बुमराहला कर्णधारपद मिळणार नसल्याने मी फार नाराज आणि निराश आहे. मला वाटतं की तो राष्ट्रीय संपत्ती आहे,” असं आर अश्विनने त्याचं युट्यूब चॅनेल ‘Ash ki Baat’ वर म्हटलं आहे. “त्याला कर्णधार केलं तेव्हा मला फार आनंद झाला होता. पण मला वाटतं आता तो स्पर्धेतून बाहेर आहे,” असं आर अश्विन म्हणाला.
बुमराहने यापूर्वी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, ज्यामधील एक जिंकला असून दोन गमावले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये भारताला एकमेव विजय मिळवून दिला. कर्णधार नेहमीच असा असावा जो संघाच्या अंतिम अकरामध्ये आपोआप प्रवेश करू शकेल असं मत त्याने त्यावेळी नोंदवलं होतं.
“अनके पर्याय आहे, पण मला आणखी एक नाव सुचवायचं आहे ते म्हणजे रवींद्र जाडेजा,” असंही आर अश्विन म्हणाला. “कर्णधार किंवा उपकर्णधार कोण असेल याबद्दल नेहमीच बातम्या येत असतात, परंतु त्यांचे नाव संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये प्रथम असले पाहिजे. त्याची निवड आपोपाप असावी,” असं अश्विन म्हणाला.
शुभमन गिलला 2024 मध्ये काही मालिकांमध्ये भारतीय संघाचा उप-कर्णधार कऱण्यात आलं होतं. ज्यामुळे तो कर्णधारपदासाठी निवडकर्त्यांच्या मनात असल्याचं दिसून आलं होतं. तथापि, गिलला यापूर्वी कधीही कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्वाची भूमिका देण्यात आली नव्हती. जेव्हा बुमराह खेळत नव्हता आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या शेवटच्या कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता, तेव्हा विराट कोहलीकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.































