भारतात पाकिस्तानी नागरिक: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र यामुळं ज्यांचे नातेवाईक भारतात आहेत अशा पाकिस्तानी नागरिकांची मोठी अडचण झालीय. त्यांची काय अवस्था झालीय. चेहऱ्यावर निराशा.. हताश नजरा. भारत सोडावा लागत असल्याचा डोळ्यात दिसणारा चलबिचलपणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकेंनतरची ही दृश्य. पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळं लग्नकार्य, वैद्यकीय उपचार किंवा नातलगांना भेटायला आलेल्या अनेकांना अचानक भारत सोडून पाकिस्तनात जावं लागतंय.
विवाहीत जोडप्यांना वेगळं न करण्याची विनंती
पंजाबच्या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारी समरीन मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 45 दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली. इथं तिचं रिझवानसोबत लग्न झालं. ती गरोदरही राहिली. तिला अजून दीर्घकालीन व्हिसा मिळालेला नाही. त्यात आता तिला अचानक देश सोडून पाकिस्तानला परत जायला सांगितलं गेलंय. सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना टुरिस्ट व्हिसा रद्द करावा मात्र भारताशी नातं जोडलेल्या कुटुंबांना तोडू नये अशी विनंती तिनं केंद्र सरकरला केलीय. समरीनचे पती रिझवान यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. मात्र या सगळ्यात किमान विवाहीत जोडप्यांना वेगळं करु नये अशी विनंती त्यांनी सरकारला केलीय.
https://www.youtube.com/watch?v=1v5ie3opcc0
पुन्हा जावं लागणार सासरी
दुसरीकडे राजस्थानच्या जोधपूर शहरातील महिलेची वेगळीच कथा आहे. तिचं लग्न पाकिस्तानात झालंय. ती माहेरी आली होती. मात्र आता तिला वेळेआधीच पाकिस्तानला परत जावं लागतंय. गुन्हेगारांना शिक्षा जरुर व्हावी मात्र सामान्य लोकांना नको अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट
तिसरी गोष्ट आहे एका आईची. या भारतीय महिलेचं 10 वर्षापूर्वी पाकिस्तानात लग्न झालं. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म भारतात झाला, मात्र मुलांकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. आपण आपल्या मुलांसोबत पाकिस्तानात जाऊ शकत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारे पाकिस्तानी नागरिक कृष्ण कुमार यांनीही सरकारला विनंती केलीय. आपण टुरिस्ट व्हिसावर 45 दिवसांसाठी भारतात आलो.. मात्र दहशतवादी हल्ल्यानं दोन देश वेगळे केले. दोन्ही देशांनी एकत्र राहावं कारण अर्धी कुटुंबे पाकिस्तानात आहेत अर्धी भारतात. त्यामुळे त्यांची ताटातूनट होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं दोन धर्म, दोन देशात पुन्हा कटुता आलीय. मात्र याची झळ दोन्ही देशात कुटुंब असलेल्या अनेक कुटुंबांनाही बसतेय. भारतात येऊन दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी हीदेखिल दृश्य बघावी. दहशतवाद्यांनी केलेल्या पापाची फळं सध्या अनेक पाकिस्तानींना भोगावी लागताहेत.

































