पुणे, (दि.२६) : भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लि., पुणे या संस्थेच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर संस्थेच्या नव्या अध्यक्षपदी विजयमाला पतंगराव कदम तर उपाध्यक्षपदी डॉ. भागवतराव पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी व सहनिबंधक नीलम पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
विजयमाला कदम या १९८५ पासून संचालक म्हणून कार्यरत असून संस्थेच्या व्यवसाय वृद्धीमधील त्यांचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीस लाखोंमध्ये असलेली वार्षिक उलाढाल आज ६० कोटी रुपयांवर पोहचली असून संस्था यशाच्या शिखरावर पोहोचण्यामागे त्यांचे कृतीशील नेतृत्व असल्याचे मानले जाते.
संस्थेच्या दहा शाखांचा विस्तार, आधुनिक बझार व्यवस्था, होलसेल विभागाची पुनर्रचना, गृहिणी, महिला व विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना, वार्षिक धान्य महोत्सव, तसेच हळदी-कुंकू सारख्या सांस्कृतिक उपक्रमांमधून ग्राहकाभिमुख दृष्टिकोन त्यांनी जपला. कार्यक्षम व तंत्रस्नेही प्रशासकीय यंत्रणा, पारदर्शक व्यवहार, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांकरिता संगणकीकरणाची अंमलबजावणी यामुळे संस्थेची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे.
निवडीनंतर बोलताना विजयमाला कदम म्हणाल्या, “डॉ. पतंगराव कदम यांनी २ ऑक्टोबर १९७३ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त संस्थेची स्थापना करताना ठरवलेली उद्दिष्टे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी व ग्राहक यांच्या सहकार्याने त्या उद्दिष्टपूर्तीची दिशा कायम राहील.”
या प्रसंगी डॉ. मंदाकिनी पानसरे, वसंतराव माने, नगरसेवक रामचंद्र कदम, डॉ. भागवतराव पवार, कुलदीप गायकवाड आणि सरव्यवस्थापक जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करताना भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, स्वप्नाली कदम, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम.एस. सगरे, व्ही.बी. म्हेत्रे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
































