पुणे (दि.२३) : “राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या अडचणी सोडवून आवश्यक सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं आहे,” असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केलं.
ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व युवक कल्याण संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सर परशुराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, महासचिव नामदेव शिरगावकर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑलिम्पिक भवन, थेट नियुक्त्या आणि सुविधा केंद्रे
भरणे म्हणाले, “१९५२ मध्ये स्व. खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यानंतर पॅरालिम्पिकमधूनही राज्यातील खेळाडूंनी मान मिळवला आहे. त्यांच्या प्रोत्साहनासाठी शासनाने ५ टक्के नोकरी आरक्षण, थेट नियुक्त्या व आर्थिक सहाय्याची धोरणं राबवली आहेत. २०२४-२५ या वर्षात १४९ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली. बालेवाडीत उभारण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक भवनातून खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा मिळणार आहेत.”
ते पुढे म्हणाले, “२०२८ व २०३२ ऑलिम्पिक स्पर्धांकडे लक्ष ठेवून प्रत्येक गावातून ऑलिम्पिकवीर घडवण्याचा संकल्प करूया. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदके मिळवावीत, हीच अपेक्षा आहे.”

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी क्रीडा व्हिजन
आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, “महाराष्ट्र हे गुणवंत खेळाडूंनी परिपूर्ण असलेलं राज्य आहे. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अपेक्षित यश हाती आलेले नाही. म्हणूनच ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटसाठी नागरिकांनीही सुचना द्याव्यात. क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून गुणवान खेळाडूंना शोधून प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, पुरस्कार दिले जात आहेत. जिल्हा, तालुका आणि विभागीय स्तरावर क्रीडा संकुलांचे काम सुरू असून यासाठी भरपूर निधी उपलब्ध केला आहे.”
गावागावांतून खेळाडू घडविण्यावर भर
ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर म्हणाले, “राज्यातील ऑलिम्पिक चळवळ ही देशातील सर्वात मोठी आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानावर आणण्याचे काम सुरू आहे. शिबिरे आणि सुविधांमुळे त्यांची पूर्वतयारी भक्कम होते.”
गौरव आणि प्रात्यक्षिकांनी भरलेला दिवस
कार्यक्रमात ऑलिम्पियन बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, हॉकीपटू रेखा भिडे, अर्जून पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, कबड्डीपटू शांताराम जाधव, रोईंगपटू स्मिता यादव-शिरोळे, तिरंदाज गाथा खडके, बॅडमिंटनपटू प्रंदीप गंधे, कुस्तीपटू गायत्री शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग आणि मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी झाली. त्यापूर्वी लाल महाल ते सर परशुराम महाविद्यालय दरम्यान ऑलिम्पिक दौडचे आयोजन करण्यात आले होते.































