एमएनएस वि अबू आझमी: मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.मशिदींवरच्या भोंग्यांमुळे जाणीवपूर्वक मुस्लीमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अबू आझमींनी केलाय.त्याला मनसेनं प्रत्युत्तर दिलं.
मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली होती.भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं.आता मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.सपाचे आमदार अबू आझमी यांनी केलेलं एक वक्तव्य याला कारणीभूत ठरलंय.
अबू आझमींनी डिवचलं
उत्तर प्रदेशच्या मंदिरातही जोरजोरात कीर्तन वाजत असतात, त्यावर कधीच कुणी आक्षेप घेत नाही, असं आझमींनी म्हटलंय.भोंग्यांच्या मुद्यावरुन केवळ मुस्लिमांना त्रास दिला जातो, असा आरोप आझमी यांनी केलाय.व्होट बँकेसाठी भोंग्यांचं राजकारण सुरू असून पोलिसांनी डेसिबल तपासावं असं आवाहनही आझमींनी केलंय.
मनसेचं प्रत्युत्तर
मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली होती.त्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे उतरवले गेले.आता अबू आझमींनी मशिदींवरच्या भोंग्यांमुळे फक्त मुस्लीमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय.याला आता मनसेनं प्रत्युत्तर दिलंय.जे चुकीचं आहे त्यालाच राज ठाकरे आणि मनसेनं विरोध केलाय.आम्ही राजकारण करत नाही, असा पलटवार मनसेनं केलाय.
अबू आझमी विरुद्ध मनसे संघर्ष
राज ठाकरेंनी जाहीर सभेतून मशिदीवरील भोंगे हटवले गेले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका घेतली होती.माझ्या हातात सत्ता द्या, 48 तासात मशिदीवरचे भोंगे हटवून दाखवतो, असं विधानही विधानसभा निवडणुकीच्या वरळीच्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी केलं होतं.आता अबू आझमींनी भोंग्यांच्या मुद्याला हात घालून मनसेला डिवचलंय. येत्या काळात याच मुद्यावरून अबू आझमी विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.































