शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, 17 मे रोजी पार पडले. या पुस्तकाच्या माध्यमातून राऊत यांनी स्वतःच्या तुरुंगवासाचा अनुभव, त्यांना आणि त्यांच्या पक्षातील नेत
?
मी रोज एक संपादकीय लिहिले, तर त्याची चर्चा होते. आता पुस्तक लिहिले, तर त्याची चर्चा झाली नाही, तर लिहून उपयोग काय? असे संजय राऊत म्हणाले. दोन दिवसांपासून अनेकांना मिर्च्या लागलेल्या आहेत. दोन दिवसांपासून मीडियावर चर्चा सुरू आहे. हे लिहिलंय, ते लिहिलंय म्हणताहेत. पण जे लिहिले ते सत्य आहे. माझी ओळख बाळासाहेबांमुळे झाली. सत्य आणि नितीमत्तेची कास सोडू नको,असे त्यांनी मला सांगितले, असे राऊत म्हणाले.
तुरुंगात असताना लेख कसा आला?
संजय राऊत म्हणाले, मी कोठडीत होतो आणि सरकारवर टीका करणारे माझे रोखठोक प्रसिद्ध झाले. मी राज्यपालांवर लिहिले होते. संजय राऊत तुरुंगात आहेत. पण रोखठोक प्रसिद्ध कसे झाले? असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे माझ्याकडे दोन अधिकारी आले. त्यांनी रात्री उठवले. चौकशी सुरू केली. म्हटले मी आधीच लिहून आलो होतो. म्हटले मला माहीत होते ते घाण करणार आहेत. तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे. तुम्ही चेक करा, असे त्यांना मी म्हणालो होतो.
दर दिवशी माझे संपादकीय रोज बाहेर यायचे. सरकारने चौकशी लावली. माझे रोखठोक येत होते. मी खूश होतो. कारण माझे काम होत होते. आतल्या गोष्टी आतच बऱ्या. या कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस खचत नाही. कारण आम्ही बाळासाहेबांसोबत काम केले. त्यांनी तीच शिकवण दिली खचू नका, असे संजय राऊत म्हणाले.
उंदीर पाहिला अन्… राऊतांचा फडणवीसांना टोला
मी एकदा तुरुंगात उभा होतो. तेव्हा मला काहीतरी दिसले. मी म्हणालो इथे ससे कुठून आले. कुंदन शिंदे म्हणाले साहेब तो ससा नाही उंदीर आहे. तिथे सशासारखे उंदीर धिप्पाड आहेत. अनिल देशमुखांनी त्यांना नावे ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे म्हणज संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
कटू आठवणी अनुभव म्हणून घ्यायच्या
80 टक्के पुस्तक तुरुंगात तयार झाले. बाकीचे 20 टक्के व्हायला 2 वर्षे लागले. आम्ही कसाबच्या बॅरकमध्ये राहिलो. ती बॅरक जयंत पाटलांनी केली होती. त्याची डिझाईन त्यांनी बनवली. आणि नंतर आम्हाला आत पाठवले. नंतर जयंत पाटील म्हणाले, कसा होता बॅरक. मीच बनवला आहे. कटू आठवणी असतातच. त्या कटू म्हणून घ्यायच्या नाही. तो अनुभव म्हणून घ्यायचा. गेलो तुरुंगात आणि आलो परत, असेही संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे पुस्तकाबद्दल काय म्हणाले?
मी उद्धव ठाकरेंना म्हटले कसे आहे पुस्तक. ते म्हणाले, मी भाषणात सांगतो. ते पुढे म्हणाले, एका वाक्यात सांगतो पुस्तकात रडगाणे नाही, असे संजय राऊत म्हणाले. मला अटक केली त्याला पश्चात्ताप झाला. आम्ही गुंडे आहोत. आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही. देशाला अशाच लोकांची गरज आहे. लोहा लोह्याला कापतो, असेही राऊतांनी ठणकावून सांगितले.
तुरुंगातील लोक बॅरिस्टर बनून बाहेर पडतात
आम्ही वाकणार नाही. काही झालं तरी जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर झुकायचे नाही. हे पुस्तक मी तुरुंगात लिहायचे ठरवले, तेव्हा मी देशमुखांनाही सांगितले. तिथल्या दरवाजात वाकून जाव-यावे लागते. तुमचा जगाशी संबंध पूर्ण तुटतो. दगडाच्या भिंती बघायच्या आणि दिवस काढायचे. लिहिणे, वाचणे, चांगले विचार करायचे. एखादा सुटला तर त्याचे जजमेंट घेऊन अभ्यास करायचो. तुरुंगातील लोक बॅरिस्टर बनून बाहेर पडतात. 8 दिवस तुरुंगात राहिला तर पीएचडी करतो, असे राऊत म्हणाले.






























