औंढा नागनात तालुक्यातील गवळेवाडी येथे शुक्रवारी ता. ९ प्रशासनाने सामुहिक विवाह सोहळ्यातील सहा पैकी चार बालविवाह रोखले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याची बालविवाह मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
?
हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचे युनीसेफच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अशिक्षीतपणा, आई, वडिल कामांसाठी बाहेरगावी जाणे, आर्थिक परिस्थिती या प्रमुख कारणांचा समावेस आहे. त्यातही जिल्हा प्रशासनाने बालविवाह होणारी पंन्नास गावे हॉटस्पॉट म्हणून निवडण्यात आली आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसांपुर्वीच यंत्रणांची बैठक घेऊन गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सामुहिक विवाह सोहळ्यावर लक्ष ठेऊन त्या ठिकाणी मुलींच्या वयाची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तर मंगल कार्यालयांनीही बालविवाह मुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गाव पातळीवर विवाह सोहळ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, आज औंढा नागनाथ तालुक्यातील गवळेवाडी या गावात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी सहा जोडप्यांचा विवाह सकाळी आकरा वाजून ३५ मिनीटांनी आयोजित केला होता. मात्र या सहा पैकी चार वधु अल्पवयीन असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, जमादार बी. जी. घुगे, बालविकास प्रकल्प कार्यालयाचे राजरत्न गायकवाड, समन्वक अंकुश पाटोडे, तलाठी ज्योती स्वामी यांनी तातडीने गावात जाऊन पाहणी केली. वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडण्यापुर्वीच या पथकाने विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. यामध्ये त्यांनी सहा वधुंच्या वयाचे पुरावे मागितले. त्यामध्ये चार वधुंचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा विवाह थांबविण्यात आला तर इतर दोन जोडप्यांचा विवाह पार पडला.
दरम्यान, पथकाने अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या दुष्परिणामांची जाणीव करुन दिल्यानंतर त्यांनी योग्य वय झाल्याशिवाय विवाह करणार नाही, अशी लेखी कबुली दिली आहे. एकाच दिवशी चार बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे.





























