दिग्पाल लांजेकरांवर अमेय खोपकर संतापले. बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे ‘क्रांतीज्योति विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. ‘क्रांतीज्योति विद्यालय’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याने, इतर मराठी निर्माते, दिग्दर्शकांच्याही मनात आशा निर्माण झाली असून अपेक्षा वाढल्या आहेत. 30 जानेवारीला दोन नवे मराठी चित्रपट रिलीज होणार असून, त्यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘ रणपति शिवराय स्वारी आग्रा ‘ आणि अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हे दोन्ही चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहेत. मात्र एकाच दिवशी दोन्ही चित्रपट येत असल्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चे निर्माते अमेय खोपकर यांनी नाराजी जाहीर केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दिग्पाल लांजेकरला आपण आता गप्प बसणार नाही असा जाहीर इशाराही देऊन टाकला आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा ‘साडे माडे तीन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. साडे माडे तीन चित्रपट हिट झाला होता, यामुळे त्याच्या सिक्वेकडूनही फार अपेक्षा आहेत. मात्र त्याच दिवशी 30 जानेवारी रोजी ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने आता त्याच्यासमोर नवं आव्हान आहे. अमेय खोपकर हे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी दिग्पालच्या निर्णयावर उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मंचावरुन दिग्पालसोबत झालेल्या संभाषणाचाही दाखला दिला.
अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले?
“मला आज एक गोष्ट सांगायची आहे, ज्याचा मी निषेध करतो. कारण इतर निर्माते गप्प बसतात, मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची तारीख मी इतर चित्रपटांसाठी तीन वेळा बदलली. दुसऱ्या सिनेमाला तारीख मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल, त्याला दोन-चार आठवडे मिळू दे, आपण नंतर घेऊ अशी भावना होती. आता तीन-चार दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरने त्याचा ऐतिहासिक सिनेमा जो आधी 16 फेब्रुवारीला येणार असल्याचं जाहीर केलं होतं, त्याचं तसं पोस्टरही लाँच झालं होतं, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि अचानक 30 जानेवारीची घोषणा केली. कोणाला विचारलं नाही, सांगितलं नाही, थेट घोषणा केली”.
“मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. मी म्हटलं ‘अहो माझ्या चित्रपटाची तारीख आधीच जाहीर केली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे.’ तर त्याने म्हटलं ‘ओह तुमची आहे का फिल्म’. मला हेच कळलं नाही की, ‘तुमची आहे का फिल्म’ म्हणजे काय? बाहेरचा एखादा निर्माता असता तर. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, हे डिस्ट्रिब्युटरचं म्हणणं आहे. मी त्यांना म्हटलं की, डिस्ट्रिब्युटरचा काहीही संबंध नसतो. चित्रपटाची तारीख हा निर्मात्याचा निर्णय असतो. मी म्हटलं की, ‘तुम्ही तारीख बदला, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमादेखील चालला पाहिजे. तुमच्या सिनेमालाही थिएटर्स मिळू देत.मी आधी तारीख जाहीर केली आहे, तुम्ही आता असं करू नका. मी एवढं बोललो आणि तारीख बदलून मला कळवा असं सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली.
“दुसऱ्या दिवशी फोन केला तर उचलला नाही. तेव्हापासून आजतायगत मला फोन आलेला नाही. मी विषय सोडून दिला, पण मी या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर चित्रपट आहे म्हणून गप्प आहे. आपण मराठी निर्माते दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि गप्प बसतो, काही बोलत नाही, म्हणून काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, त्यांना बॅन करण्याची गरज आहे.’
“दिग्पाल लांजेकरने असाच आगाऊपणा केला, तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की, दिग्पाल लांजेकरवर बंदी टाका. आमच्या चित्रपटासाठी 150-200 लोकांनी मेहनत घेतली, त्यांची मेहनत काय फुकट जाऊ द्यावी? मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो, त्यांनादेखील थिएटर मिळू दे, आम्हालादेखील थिएटर मिळू दे,” असं त्यांनी शेवटी म्हटलं.































