T20 विश्वचषक 2026 : भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये सध्या तणाव वाढलाय. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्ववभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानच्या खेळण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर केकेआरने मुस्तफिजूर रहमानला रिलीज केले. यानंतर बांगलादेशचा तिळपापड झाला आणि त्यांनी आपल्या देशात आयपीएल प्रसारणावर बंदी घातली. एवढंच नाही तर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतात सामने येण्यासाठी यायला सुद्धा नकार दिला. त्यांनी आयसीसीकडे त्यांचे वर्ल्ड कप सामने हे पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेत खेळवण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली आणि भारतात बांगलादेश खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल असे सांगितले. मात्र तरीही बांगलादेशची नाटक सुरूच आहेत असं दिसतंय.
राष्ट्रीय अपमानाच्या किंमतीवर…. :
बांगलादेश सरकारचे स्पोर्ट्स एडवाइजर अजीफ नजरुलने म्हटले की, ‘देशाच्या सन्मानाच्या किंमतीवर राष्ट्रीय संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही. मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून हटवल्यामुळे बांगलादेशच्या क्रिकेट जगतात भारताविषयी राग आहे. बुधवारी एक बैठक घेऊन नजरुलने सांगितले की, ‘आम्ही बीसीबी संचालकांसोबत बुलबुल (अमिनुल इस्लाम) भाई, फारुख भाई आणि इतर सर्वजण बसलो होतो. आज आम्ही परिस्थितीवर चर्चा केली आणि आम्ही सर्वजण सहमत झालो की बांगलादेशने टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्र होण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. आम्ही क्रिकेटवेडा देश आहोत आणि आम्हाला निश्चितच खेळायचे आहे’.
अजीफ नजरुलने म्हटले की, ‘आम्हाला राष्ट्रीय अपमानाच्या किंमतीवर, आमच्या क्रिकेटपटूंच्या, प्रेक्षकांच्या आणि पत्रकारांच्या सुरक्षेच्या किंमतीवर किंवा देशाच्या प्रतिष्ठेच्या किंमतीवर वर्ल्ड कप खेळायचा नाही. आज आयसीसीकडून मिळालेले पत्र वाचल्यानंतर आम्हाला असे वाटले की बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी भारतातील गंभीर सुरक्षा परिस्थिती त्यांना पूर्णपणे समजली नाही’.
हेही वाचा : न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी रोहित आणि विराट आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोणत्या स्थानावर?
बांगलादेशचा पुढचा प्लॅन काय?
बीसीबी अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुलने म्हटले की बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं आणि गुरुवार किंवा शुक्रवारी आयसीसीला एक लेटर पाठवेल. रिपोर्ट्सनुसार आयसीसीने बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून दोन देशांमधील तणाव कमी केला जाऊ शकेल. सूत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या मागणीवर आयसीसीने विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. पण हे स्पष्ट केलंय की, ते सरकारशी चर्चा करून मगच या संदर्भातील निर्णय घेतील.
आयसीसीच्या एका वरिष्ठ प्रशासकाने सांगितले की, ‘आयसीसी बांगलादेशला भारतात खेळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल. हे फक्त दोन संघांबद्दल नाही; त्यात प्रेक्षक, चाहते, प्रसारक आणि प्रवासी माध्यमांचाही समावेश असणार आहे’. यापूर्वी, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले होते की हे सामने श्रीलंकेत हलवल्याने आयोजक आणि प्रसारकांसाठी मोठे लॉजिस्टिक संकट निर्माण होऊ शकते.






























