भारतातील वाहन क्षेत्र: कार, दुचाकी वाहनं किंवा एकंदरच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारतानं मागील दशकभराच्या काळात अतिशय झपाट्यानं प्रगती केली आहे. संपूर्ण जगात भारताच्या या क्षेत्रातील उंचावणाऱ्या आलेखाचीच चर्चा होत असताना आता देश आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतात तयार होणाऱ्या कारना आता फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठी मागणी असून, त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. Made In India अर्थात भारतात तयार होणाऱ्या कारची जगभरातून मागणी सातत्यानं वाढत असल्या कारणानं त्याचा थेट परिणाम निर्यातीवर पाहायला मिळत आहे. ज्यामुळं 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आधीच भारतानं आठ महिन्यांत कार निर्यातीत विक्रम रचला असून आणखी एका नव्या विक्रमाच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान मागील आठ महिन्यांच्या काळात भारतातून तुलनेनं परदेशात अधिक कारची निर्यात झाली, ज्यामुळं ऑटो क्षेत्रात सध्या देशाचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोणी सादर केली ही लक्षवेधी आकडेवारी?
SIAM च्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या 8 महिन्यांपूर्वी भारतातून जवळपास 5,99,276 पॅसेंजल वेहिकल परदेशात पाठवण्यात आले होते. मागील वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेक ही संख्या 20 टक्क्यांनी जास्त आहे. FY24-2025 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान भारतातून 4,98,763 वाहनांची निर्यात करण्यात आली होती. म्हणजेच यंदाच्या वर्षी थेट 1 लाख युनिटनं यामध्ये वाढ झाल्यानं भारतीय निर्मितीच्या वाहनांना जगभरातून पसंती मिळत असल्याची अतिशय सकारात्मक बाब समोर येत आहे.
FY2026 पूर्ण होण्यासाठी आता चार महिन्यांचा कालावधी असतानाच तिथं कार निर्यातीत मात्र झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळं देश आणखी एका विक्रमाच्या वाटेवर असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या संपूर्ण आर्थिक आणि प्रगतीशील घडामोडींमध्ये भारताच्या वाटेत काही अडथळेसुद्धा आले.
दरम्यानच्या काळात मेक्सिकोनं भारतीय बनावटीच्या कारवर 1 जानेवारी 2026 पासून Import duties अर्थात आयात शुल्कामध्ये 20 टक्क्यांनी वाढ करत ही रक्कम 50 टक्क्यांवर नेली. प्रत्यक्षातम मेक्सिको भारतासाठी एक मोठं निर्यात क्षेत्र असल्यामुळं याचा देशाला फटका बसताना दिसत आहे. मेक्सिकोमध्ये दरवर्षी भारतातून बलेनो, स्विफ्ट, डिझायल, ब्रेझा, ह्युंडई ग्रँड आय10, ऑरा, वेन्यू, क्रेटा अशा कार पाठवण्यात येतात. याशिवाय फोक्सवॅगन आणि निसानच्या कारनाही मेक्सिकोतून मागणी असते.
भारताची ऑटो क्षेत्रावर भक्कम पकड…
भारतीय वाहनांना जगभरातून असणाऱ्या मागणीमुळं देशाच्या आर्थिक विकासाला हातभारच लागला नसून त्यामुळं या क्षेत्रात निर्मितीच्या बाबतीतही भारताकडे आता एक मुख्य केंद्र म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळं आता येत्या काळात देश या संधीचं सोनं नेमकं कसं करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





























