उर्वशी पराभूत, नवी दिल्ली: खजुराहो येथील वामन (जावरी) मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या बदलीबाबतच्या त्यांच्या टिप्पण्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गुरुवारी न्यायालयात त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यांचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला गेला असून ते सर्व धर्मांचा आदर करतात.
16 सप्टेंबर रोजी राकेश दलाल यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला उद्देशून म्हटले होते. “तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात असं म्हणता, तर जा आणि त्यांची प्रार्थना करा, स्वतः देवाला ते करायला सांगा.” खंडपीठातील न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांनीही सोशल मीडियावर त्यांचे वक्तव्य चुकीचे सादर करण्यात आल्याचे सांगितले आणि सोशल मीडियाला “अँटी-सोशल मीडिया” अशी उपमा दिली.
दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील संजय नुली यांनीही स्पष्ट केलं की, सरन्यायाधीशांबाबत सोशल मीडियावर फिरत असलेली विधाने पूर्णतः खोटी आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीत उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सरन्यायाधीशांचा बचाव केला. ते म्हणाले की, “मी त्यांना १० वर्षांपासून ओळखतो. ते सर्व धार्मिक स्थळांना भेट देतात. सोशल मीडियावर अनाठायी अतिशयोक्ती केली जाते. न्यूटनचा नियम आहे की जशी क्रिया तशी प्रतिक्रिया, पण सोशल मीडियावर प्रत्येक क्रियेला अतिरेकी प्रतिक्रिया दिली जाते.”
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही या मताला समर्थन दिले आणि सांगितले की, सोशल मीडियामुळे वकिलांनाही रोज अडचणींना सामोरे जावे लागते. विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी एक्सवर लिहिले की, “न्यायालये ही न्यायाचे मंदिर आहेत. भारतीय समाजाचा न्यायालयांवर विश्वास अबाधित राहणेच नव्हे, तर तो अधिक दृढ व्हावा ही सर्वांची जबाबदारी आहे. भाषणात संयम ठेवणे हे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायाधीश यांचेही कर्तव्य आहे.”

































