संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले असून या पालखी सोहळ्यात सुमारे ३०० पेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. मंगळवारी ता. १७ हिंगोलीत पहिले गोल रिंगण होणार आहे.
?
संत नामदेव महाराज संस्थान येथे सोमवारी ता. १६ दुपारी तीन वाजता पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, द्वारकादास सारडा, भागवत सोळंके, शशीकांत गवते, ज्ञानेश्वर किर्तनकार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर गावात प्रदक्षिणा घेण्यात आली असून पालखीचा आजचा मुक्काम नर्सी नामदेव गावातच झाला आहे.
दरम्यान, मंगळवारी ता. १७ सकाळी सात वाजता पालखी घोटा, सवड, केसापूर मार्गे दुपारी चार वाजता हिंगोलीत पोहोचणार आहे. हिंगोली येथील महाराजा अग्रसेन चौकात पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत केले जाणार असून यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेली पालखी रामलिला मैदानावर आल्यानंतर त्या ठिकाणी पहिले गोल रिंगण होणार आहे. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मंगळवारी ता. १७ हिंगोलीत मुक्कामी थांबलेला पालखी सोहळा बुधवारी ता. १८ औंढा नागनाथ, गुरुवारी ता. १९ बाराशिव, ता. २० जून हट्टा मार्गे पालखी सोहळा ता. २१ जून रोजी परभणी जिल्हयात पोहोचणार आहे. यापालखी सोहळ्यात परभणी पासून सुमारे एक हजार पेक्षा अधिक भाविक सहभागी होणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा…
राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय:वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी; 18 जून ते 10 जुलै दरम्यान लागू
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत. वाचा सविस्तर






























